जगण्यातली वास्तविकता, आव्हानांना भिडण्याचं धैर्य आणि वाचकाच्या थेट अंतरात उतरण्याची शैली ही कविता घेऊन येते. अत्यंत सघन, अर्थगर्भ आशय वाचकाला वैश्विक अनुभूती देऊन जातो. हेच तर पाब्लो यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही. तुम्ही वाचतच नाही काही, जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर, चुकून कधी नाही देत, तुम्ही स्वतःच्याच पाठीवर शाबासकीची थाप याचा अर्थ, तुम्ही मरताय, हळूहळू… या पाब्लो नेरुदा यांच्या कवितेतल्या काही ओळी. माणसाचं जगणं, असणं यात खोल पाळंमुळं रुजलेली, प्रगल्भ जीवनानुभूतीनं रसरसलेली आणि मुक्त, स्वतंत्रतेच्या आभाळात नीडरपणं विहरणारी, असं पाब्लो यांच्या कवितेचं वर्णन करता येईल.
पाब्लो यांचा जन्म जरी चिली या देशात झालेला असला तरी त्यांच्या कवितांनी संपूर्ण जगावर प्रभाव टाकला. नोबेल विजेते कादंबरीकार गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांनी “विसाव्या शतकातला जगभरातला सर्वोत्तम कवी,’ अशा शब्दांत पाब्लो यांच्या काव्याचा गौरव केलाय. रिकार्डो एलिसर नेफ्ताली रेस बासोल्टो हे पाब्लो यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म 12 जुलै, 1904 मध्ये चिलीतल्या सॅंटियागोपासून सुमारे 350 किमी अंतरावर असलेल्या एका शहरात झाला. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी तर आई शिक्षिका होत्या. पाब्लो यांच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर पाब्लो यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. पाब्लो यांचं बालपण त्यांच्या सावत्र बहिणीसोबत गेलं. अवघ्या बारा वर्षांच्या वयात (1914) पाब्लो यांनी त्यांच्या काव्य लेखनाला सुरुवात केली.
“सेल्वा ऑस्ट्रल’ या साहित्यिक नियतकालिकासाठी वयाच्या 16 व्या वर्षी काम सुरू केल्यानंतर झेक रिपब्लिकमधील कवी जान नेरुदा यांच्या सन्मानार्थ त्यांनी सुरुवातीला पाब्लो नेरुदा या टोपणनावानं लेखन केलं. पुढं अधिकृतपणे त्याच नावानं त्यांनी लेखन केलं.
फ्रेंच भाषेच्या शिक्षणासाठी सॅंटियागो इथं असताना पाब्लो यांनी चिलीयन विद्यार्थी संघटनेने घेतलेल्या काव्यस्पर्धेत पारितोषिक मिळविलं. ह्या संघटनेच्या नियतकालिकात त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. “क्रेपुस्कुलरियो’ (1923) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर “ट्वेंटी लव्ह पोएम्स अँड अ सॉंग ऑफ डिस्पेअर’ या संग्रहानं त्यांना कविकुळात उच्च स्थानी नेऊन बसवलं. या कवितासंग्रहानं भरभरून दिलेल्या प्रतिष्ठेनंतर पाब्लो पूर्णवेळ कविता लिहू लागले. “अटेम्प्ट ऑफ द इनफिनीट मॅन’ (1926), “एन्थुझिऍस्टिक’ (1933), “रेसीडन्स ऑन द अर्थ’ (1933) हे त्यांचे काही विशेष काव्यसंग्रह.
1927 ते 1935 या काळात मानद सल्लागार म्हणून त्यांनी जगभरात प्रवास केला. या काळात त्यांनी बर्मा, सिलोन, जावा, सिंगापूर, बार्सिलोना, माद्रिद या देशांना भेटी दिल्या. याच प्रवासादरम्यान त्यांनी गूढ, अतिवास्तववादी कवितांचं लेखन केलं. “रेसीडेन्स ऑन अर्थ’ हा त्या कवितांचा संग्रह जगभरात गाजला. हा संग्रह त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला.
चिली देशाच्या सिनेटच्या सदस्यपदी 1945 मध्ये ते निवडले गेले. देशाच्या विकासासाठी आवश्यक अनेक बाबींमध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण योगदान दिलं. 1948 मध्ये चिलीत सरकार बदललं. नव्या सरकारनं कम्युनिस्ट पक्षावर बंदी आणली. त्यावेळी पाब्लो यांच्या अटकेचेही आदेश काढण्यात आले. पण त्यांच्या मित्रांनी त्यांना काही महिने व्हालप्रेसो या शहरातल्या एका तळघरात लपवून ठेवलं. त्यानंतर पाब्लो एका गुप्त रस्त्यानं अर्जेंटिनात गेले. 1952 मध्ये ते चिलीत परतले.
चिलीत 1970 मध्ये सत्तांतरानंतर कम्युनिस्ट पक्षाचे साल्वादोर आलेंदे हे राष्ट्राध्यक्ष झाले. नोबेल पारितोषिक स्वीकारल्यानंतर आलेंदे यांनी पाब्लो यांचा 70 हजार लोकांच्या उपस्थितीत भव्य सत्कार केला. त्यांनी पाब्लो यांना फ्रान्सचा राजदूत बनवलं. 1973 मध्ये चिलीत झालेल्या लष्करी उठावात आलेंदे यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर काही दिवसांतच सॅंटियागो इथं पाब्लो यांनीही जगाचा निरोप घेतला.
माझं जीवन हीच एक दीर्घ कविता आहे. माझ्या मृत्यूच्या वेळी अखेरच्या शब्दांबरोबरच ती कविता संपेल, असं पाब्लो यांनी म्हटलं होतं. कवितेशी सर्वांगांनी नाळ जोडलेल्या पाब्लो यांनी काव्याचे अनेक प्रकार लीलया हाताळले. भावकविता, वास्तववादी कविता, महाकाव्य या सगळ्यांत त्यांनी तितक्याच ताकदीनं लेखन केलं. वाचकाला गदागदा हलवून वास्तवाचं भान देणाऱ्या त्यांच्या कवितांना जगभरातून व्यापक प्रतिसाद मिळाला. 1966 मध्ये पाब्लो यांना जागतिक पेन परिषदेसाठी न्यूयॉर्क इथं बोलावणं आलं. कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेनं बंदी लादली होती. पण या परिषदेचे संयोजक, नाटककार आर्थर मिलर यांनी अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांना गळ घालून पाब्लो यांना व्हिसा द्यायला राजी केलं होतं.
पाब्लो यांची कम्युनिस्ट विचारसरणी आणि निरीश्वरवादी भूमिका सर्वज्ञात आहे. त्यांनी अखेरपर्यंत या विचारसरणीचा जोरकसपणे पुरस्कार केला. कम्युनिस्ट पक्षामुळे त्यांनी राजकारणात अनेक पदांवर कामही केलं. पण त्यामुळे त्यांनी इतर विचारसरणीच्या लोकांना तुच्छ लेखलं नाही. त्यांच्या लिखाणातून त्यांची ही सर्वसमावेशक, मानवतावादी दृष्टी स्पष्टपणे दिसून येते. पाब्लो यांची कविता जगभरातल्या कवींसाठी आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या काव्यसंग्रहांचे जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या कवितेचे विषय, आशय, मांडणी, भाषा आणि वाचकाच्या अंतरात थेट अर्थ पोचवण्याची शैली यामुळे अनेकांना प्रभावित केलं. जगण्याकडे अत्यंत निःस्पृह वृत्तीनं बघण्याची, त्याचवेळी वास्तवाला धीरानं भिडण्याची ताकद नि सोप्या शब्दांतून मानवतेचं तत्त्वज्ञान पेरण्याची हातोटी ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य म्हणता येतील.
“जगातल्या एका खंडाचं भविष्य नि स्वप्न यासाठी लिहिलेल्या नैसर्गिक ताकदीच्या कृतिशील काव्यासाठी हे पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे’, असं नोबेल समितीनं पाब्लो यांचा गौरव करताना म्हटलंय. सशक्त, वास्तववादी नि तितक्याच प्रभावी शब्दांचा स्वामी असलेल्या या सिद्धहस्त कवीनं 1973 मध्ये वयाच्या 69 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला.
-डॉ. भालचंद्र सुपेकर