संध्याकाळची गडबड चालू होती. मी आपली स्वयंपाकात मग्न. लवकर स्वयंपाक संपवून मला लिहायला बसायचे होते. मी पोळ्या करता करता त्याला हाक मारली पण रोजच्यासारखी “आलो, आलो’ची आरोळीही आली नाही की, “काय गं, सारखी हाका मारत असतेस’ची भुणभुणही आज नव्हती. कुठे गेला हा असा संध्याकाळचा? असा मी विचार करतानाच ह्याने मागून येऊन घट्ट गळामिठी मारली. मी ओरडले, “अरे काय हे! दिसत नाही का पोळ्या करतेय. एवढा मोठा झालास तरी खोड्या काही संपत नाहीत तुझ्या. तो हिरमुसला. पटकन हातातल्या रूमालाची पुरचूंडी त्याने कट्ट्यावर ठेवली आणि गेला. मी लक्षच नाही दिले. नंतर तोही अजिबात आला नाही लूडबूड करायला.
जेवायची वेळ झाली तरी नेहमीसारखा भूक म्हणून पण ओरडला नाही. मीच दोन हाका मारल्या पण एक नाही की दोन नाही. अचानक लक्ष कट्ट्यावरच्या रूमालाकडे गेलं. उघडून पाहिलं तर मला आवडणारी चाफ्याची फुलं होती. माझ्या चटकन लक्षात आलं. कुठे गेले होते ते. मी तसाच रूमाल घेऊन त्याच्या खोलीत गेले. खिडकीतून बाहेर बघत पाठमोरा उभा होता. माझ्या हातातली फुलं बघून मला म्हणाला, “आई…तुला आवडतात ना गं. म्हणून मित्राच्या बागेतल्या झाडाची तोडून आणलीत. मी स्वतः चढलो गं वर. हे बघ ना किती सुंदर आहेत ना!
खरंच नुकतीच उमललेली ती चाफ्याची फुलं खूप सुंदर होती आणि त्यांच्या दरवळानं माझेही हात सुगंधित झाले होते. मी क्षणभर तो सुगंध मनात भरून घेतला. माझे डोळे भरून आले. त्याला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवतं राहिले काही न बोलता. सुगंध काय फक्त फुलांनाच येतो? नात्यातला सुगंधही असाच अविट असतो. काही दरवळ फक्त नाकाचीच नाही तर मनाचीही तृप्ती करतात. नात्यांचे दवरळही तसेच असतात काहीसे. निरनिराळ्या भावनांचे, तशाच वेगवेगळ्या फ्लेवर्सचे प्रत्येक नात्याचा गंध वेगळा, तसाच दरवळही वेगळा. जे नातं पुन्हा जगावसं वाटतं त्या नात्याचा फ्लेवर आठवायचा आणि अनुभवायचे त्यांचे दरवळ. खासकरून त्यात मायेचा ओलावा मिसळला असेल तर ते तसेच दरवळत राहतात वर्षानुवर्ष.
काही नाती जन्मभर जोडलेली असतात, काही बंधनात अडकतात, तर काही जपली जातात. कोणतेही नाव न देता. एकमेकांना सांगितले जाते, नात्याला काही नाव नसावे तू ही रे माझा मितवा. हा जो काही नात्यांचा बंध असतो तो सहवास, आपुलकी, माया अशा धाग्यांनी गुंफला गेला तरच चिरकाल टिकतो. त्यातली सहजता तितकीच महत्त्वाची. आपण जितके एखादे नाते सहजतेने वागवू तेवढे ते फुलत जाते,मोकळे होते. हे सहजपण म्हणजे तरी काय? तर उत्स्फुर्तता जपणे. क्रियेला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देणे आणि गुंफण गुंफत राहणे. हे नात्यांचे रेशिमबंध घट्ट असतील तर त्यातील मऊ, मुलायम, स्निग्ध भाव आणि तेच बंध उसवलेले, विसविशीत असतील तर त्यातील टोकदारपणा,शुष्कता हे देखील तेवढ्याच संयतपणे समजून घेण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करणे हे देखील गुंफण जपणेच होय.
सहजतेवरून आठवले नाती जपताना, गुंफताना माणसं घडवायची पण आपल्या हातातली छिन्नी दिसू द्यायची नाही. मुळात घडवायची हा शब्दही चूकच. त्यांना त्यांच्या कलेन घडू द्यायचं. त्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार व्हायचं. शांतपणे सोबत करायची. अविर्भावाचा असुरी रंग स्वतःला स्पर्शू द्यायचा नाही. अशा नितळ प्रक्रियेतच खरेपण जोपासायचे ही नात्यांची विण आणि गुंफण. मनात विचारांच्या सरी झिरझिरू लागल्या आणि डोळ्यांतून ओघळताना हातातल्या चाफ्याला भिजवू लागल्या.
माझे भरलेले डोळे पाहून त्याचा रुसवा क्षणात छू झाला. तो गोंधळला.त्याला कळेना आपली आई का रडतेय? “आई, रडू नको ना गं! काय झालं तुला? तू रागावलीयस का माझ्यावर? अगं काय झालं तुला? तो विचारत राहिला. काहीच नाही बोलले. पण एक मात्र नक्की, नात्यातले हे दरवळ नकळत जपताना आज तो माझी आई झाला होता.
मानसी चिटणीस