अतिशहाणा त्याचा बैल रिकामा… रोजच्या जगण्यातली ही म्हण मला तंतोतंत लागू पडली ते ती मी केलेल्या अतिशहाणपण्यामुळेच… हे कथानक पंचवीसेक वर्षे पूर्वीचे… माझा गार्मेण्ट्सचा व्यवसाय स्थिरस्थावर होत होता. व्यवसायाच्या नव्या वाटा धुंडाळाव्या म्हणून काहींच्या सांगण्यावरून लुधियाना येथील कपड्याच्या मार्केटची चाचपणी करण्याचा मनसुबा आखला. धाकट्या आशिषनेही येण्यास अनुकूलता दाखवली. या बरोबर वैष्णवदेवीच्या दर्शनाला ही जाऊया! असे ठरले. रेल्वेचे आरक्षण मागविले.
आम्हाला येतानाचे एकहत्तर-बाहत्तर क्रमांकाचे बर्थ मिळाले. एकहत्तर-बाहत्तर म्हणजे बोगीच्या दाराला लागून असलेले साइड बर्थ. हे बर्थ म्हणजे प्रत्येक स्टेशनवर चढ-उतार करणाऱ्याला टेकण्याची हक्काची जागा, मग त्यांच्या बरोबर हुज्जत घालणे हे आलेच, अर्थात आपल्या निवांतपणाची तर पार ऐशीतैशीच. तरी आशिषने आहे तशी तिकिटं असू दे असा सल्ला दिला; पण माझ्यातला चिकित्सक स्वस्थ बसेना. मी माणसाला नवे तिकीट आणायला पाठवले; तोवर वेटिंग लिस्ट सुरू झाली होती. वेटिंगची दोन तिकिटे तो घेऊन आला. मी विचार केला की, वेटिंगचे तिकीट कन्फर्म झाले की साइड बर्थची तिकिटे रद्द करूया. लुधियानाचे काम करून आम्ही वैष्णवदेवीला पोहोचलो. तिथं पोहोचताच प्रतीक्षा तिकिटाबद्दल विचारणा केली. त्यांनी तिकीट कन्फर्म झाले असल्याचे तसेच तिकीट क्रमांक वेळेवर समजेल असे सांगण्यात आले.
मी खूश झालो व आधीचे कन्फर्म असलेले तिकीट रद्द केले. अरे! पण परत एकहत्तर बाहत्तर बर्थ मिळाले तर? आशिषनी साशंक होत विचारले. मी म्हणालो बघू, पण आतील बर्थ मिळण्याचे चान्स पण वाढले ना.
वैष्णवदेवीचे यथासांग दर्शन घेऊन आम्ही गाडी सुटायच्या अर्धा तास आधी जम्मू स्टेशनला पोहोचलो. तिथं मोठी गोंधळाची स्थिती नजरेस पडली. पुढे समजले की काही तांत्रिक कारणामुळे रेल्वेच्या दोन बोगी कमी लागल्या आहेत आणि त्यामुळे वेटिंगचे कन्फर्म झालेले साऱ्यांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. बरेच प्रवासी त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांशी वाद घालत होते. आमचे आरक्षणही रद्द झाल्याचे कळाले. आमच्या पायाखालची तर वाळूच सरकली. हातचं सोडून धावत्याच्या मागे जाण्याचा माझा शहाणपणा नडला होता. जवळपास बेचाळीस तासांचा प्रवास आणि हाती आरक्षण नाही, आमचे धाबेच दणाणले. डोकं गरगरू लागले. “मरता क्या न करता’ उक्तीप्रमाणे प्राप्त परिस्थितीत प्रवास करण्याशिवाय काहीही पर्याय नव्हते. स्वच्छतागृहाजवळ कशी बशी का होईना बसण्यापुरती जागा मिळाली.
आपल्यावर अशी पाळी येईल अशी कधी कल्पनाही केली नव्हती. आपल्या सामानाची काळजी घ्यावी की प्रत्येक स्टेशनवर चढण्याऱ्या गर्दीस थोपवावे; टीसी मागे जागेसाठी मिनतवारी करत फिरावे; की आहे ती जागा कोणी बळकावून घेऊ नये इकडे लक्ष द्यावे, अशा कचाट्यात आम्ही सापडलो होतो. त्यात उन्हाळ्याचे दिवस, घामाचा कुबट वास, जीव पार मेटाकुटीला आला होता. आशिषचा सल्ला न मानल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरही नाराजी उमटलेली होती.
जवळपास अर्धा दिवस आणि सारी रात तिथं खितपत काढावी लागली. काळ रात्रच होती जणू काही ती. सकाळी दिल्लीला पोहोचल्यावर नवीन टीसी आला. आमचे नशीब थोर की तो मराठी आणि त्यात पुणेकर निघाला. त्याच्या समोर सारी कैफियत मांडली. प्रांत प्रेम म्हणून त्याने महत्प्रयासाने एक बर्थ उपलब्ध करून दिले. आम्हाला जणू अख्ख्या जगाचे राज्य मिळाले. पुढे पुण्यापर्यंतच्या प्रवासाच्या अडचणी कमी झाल्या. थोडे का होईना पण शेवट गोड झाला.
बऱ्याचदा स्थितीशी झगडताना, प्रारब्धाच्या मनात काय आहे हे समजण्यास आपण कमी पडतो; म्हणून प्रत्येक वेळी स्वतःची अक्कल पाजळणे योग्य असतेच असे नाही. काही गोष्टी आहे तशा स्वीकारल्या पाहिजेत, असा धडा या ट्रीपने शिकवला.
– सत्येंद्र राठी