नवी दिल्ली : (वंदना बर्वे ) – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने, भारतीय रेल्वे भारत सरकारच्या आरोग्य सेवा उपक्रमांना पूरक ठरतील असे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या दिशेने भारतीय रेल्वे सर्व परिमंडळे, उत्पादन विभाग आणि सार्वजनिक क्षेत्र उपक्रम यासाठी पुन्हा वापरण्यायोग्य फेस मास्क आणि सॅनिटायझर्सची निर्मिती करीत आहे.
भारतीय रेल्वेने सर्व परिमंडळे, उत्पादन विभाग आणि सार्वजनिक क्षेत्र उपक्रम यांच्यामार्फत 7 एप्रिल 2020 पर्यंत एकूण 582317 पुनर्वापर करता येणाऱ्या मास्कची तसेच 41882 लिटर हॅंड सॅनिटायझर्सची निर्मिती केली. काही रेल्वे परिमंडळांनी याकामी पुढाकार घेतला.
अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी रेल्वेची मालवाहतूक सेवा आठवड्याचे सातही दिवस 24 तास सुरु आहे. त्यामुळे रेल्वे परिचालन आणि देखभाल कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सर्व कामाच्या ठिकाणी खालील गोष्टींची खात्री केली जात आहे.
कामावर येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना काढ-घाल करता येईल असे फेस कव्हर आणि हॅंड सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कंत्राटी कामगारांनाही या सुविधा पुरविल्या जात आहेत. रेल्वे कार्यशाळा, प्रशिक्षण आगार आणि रुग्णालये स्थानिक पुरवठा करण्यासाठी स्थानिक पातळीवर सॅनिटायझर्स आणि मास्कची निर्मिती करीत आहेत.
आरोग्य चांगले राखण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा वापरता येणारे फेस कव्हर्स वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला पुन्हा वापरता येणारे फेस कव्हर्सचे 2 संच देण्यात आले आहेत. हे फेस कव्हर्स दररोज साबणाने स्वच्छ धुण्याविषयी सर्व कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले जात आहे. या संबंधी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप सर्वाना करण्यात आले आहे.
8.5 लाख गरजूंना अन्नाचे वाटप
लॉकडाऊनच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत रेल्वेने गरजूंना मोठ्या प्रमाणात अन्न वाटप सुरु केले आहे. आयआरसीटीसी किचनमधे, आरपीएफ आणि स्वयंसेवी संस्थांच्या योगदानातून हे अन्न तयार करण्यात येत आहे. 28 मार्चपासून भारतीय रेल्वेने आतापर्यत 8.5 लाख भोजनांचे गरीब, निराधार, बालके, हमाल, स्थलांतरित मजूर, अडकलेल्या व्यक्ती आणि रेल्वे स्थानकाजवळील व्यक्तींना वाटप केले आहे. रेल्वेने आपल्या प्रयत्नांची व्याप्ती वाढवत जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांशी सल्लामसलत करून गरजूंनाही अन्न आणि इतर सहाय्य पुरवित आहे.