अरुण पवार
पाटण – सध्याचे विद्यमान मंत्री शंभूराज देसाई यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपल्या निवडणूक वचननाम्यात पाटणला उद्योगांची निर्मिती करणार असल्याचे वचन दिले होते. परंतु, अद्याप पाटण तालुक्यात मोठे उद्योग आलेले नाहीत. तसेच पाटण (तामकडे) येथील एमआयडीसीला कित्येक वर्षांपासून आलेली मरगळही दूर झालेली नाही. त्यामुळे साहेब, आता पाटणला उद्योग आणा, अशी साद पाटण तालुक्यातील तरुणाई घालताना दिसत आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात एक वजनदार मंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासातील व त्यांच्या जिल्ह्यातील एकमेव मंत्री म्हणून सध्या शंभूराज देसाई यांना ओळखले जाते. राजकारणाचा भाग वगळता शंभूराज देसाई यांनी दोन वेळा मंत्री झाल्यानंतर स्वतःचा मतदारसंघ असलेल्या पाटण तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला. रस्त्याचे जाळे निर्माण केले, यात शंका नाही. तालुक्यात फेरफटका मारल्यानंतर कोणाच्याही तोंडून “शंभूराजे देसाई यांचे काम बोलतयं’ अशीच प्रतिक्रिया उमटते.
पाटणला उद्योग आणण्याबाबत किंवा तरुणांच्या हाताला काम देण्याबाबत शंभूराज देसाई यांनी आत्तापर्यंत हलगर्जीपणा केला, असे मुळीच म्हणता येणार नाही. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेकवेळा नोकरी मिळावे घेऊन त्यांनी सुशिक्षित तरुणांना जागेवरच नोकरी उपलब्ध करून दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे अनेकवेळा प्रयत्न करून पाटण (तामकडे) एमआयडीसीत कसे उद्योग येतील, यासाठीचे प्रयत्न केले आहे. तसेच पाटणच्या तहसील कार्यालयामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलावून अनेकवेळा बैठका घेत एमआयडीसीबाबत आढावाही घेतला. त्यावेळेस ना. देसाई राज्याचे गृहराज्यमंत्री होते.
गेल्या एक वर्षापासून राज्याच्या राजकारणात उलथा-पालथ सुरू आहे. दरम्यान, नवीन सरकार स्थापन झाले. यामध्ये शंभूराज देसाई यांचा आमदारकीचा बराच कार्यकाळ व्यर्थ गेला. परंतु, अखेर त्यांनी घेतलेला निर्णय पाटण तालुक्याच्या पथ्यावर पडला असल्याचे चित्र आहे. आज पाटण तालुक्याने कात टाकली असून गावागावातील विकासकामांमुळे तालुक्याचे रुपडे पालटल्याचे दिसते. विशेष करून वाडी-वस्तीवरील रस्ते चकाचक झालेले दिसतात. शंभूराज देसाई यांनी आपल्या कामाचा झपाटा दाखवून दिला आहे. त्यामुळे साहेब, आता एकच काम उरले आहे. ते म्हणजे पाटण तालुक्यात छोट्या-मोठ्या कंपन्या, कारखाने, कुटीर किंवा वस्त्र उद्योग, एखाद्या कंपन्यांचे युनिट तालुक्यात खेचून आणा, अशी मापक अपेक्षा तरुण वर्ग आणि महिला व्यक्त करताना दिसत आहेत.
जनतेने आपल्या लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा करणे रास्तच आहे. तसेच तालुक्यात नवीन उद्योगधंदे आणण्याची हीच वेळ आहे. कारण, शंभूराज देसाई सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शिवाय राज्याच्या मंत्रिमंडळात प्रमुख मंत्र्यांपैकी ते एक आहेत. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केव्हाही संपर्क करू शकणारे आणि तालुक्यातील विकासकामांना निधी कसा मिळवून द्यायचा, ही कला त्यांच्यात आहे. ती भल्याभल्यांना आजही जमणार नाही. म्हणूनच आगामी वर्षभरात शंभूराज देसाई यांनी पाटणच्या तामकडे एमआयडीसीचा कायापालट करून ती पूर्ववत करावी, अशी अपेक्षा मतदारसंघातून व्यक्त होताना दिसत आहे.
पाटणलाच मागासलेपणा का?
पाटणच्या पश्चिमेला असणारा चिपळूण तालुका आणि पूर्वेकडील कराड तालुका यातील दोन्ही एमआयडीसी प्रक्ल्प प्रगतशील आहेत. त्यामुळे अनेकांना काम, नोकरी मिळाली असून स्थानिकांनाही त्यामुळे रोजगार मिळाला आहे. मात्र, पाटणलाच उद्योगाच्या बाबतीत मागासलेपणा का? अशी खंत मतदारसंघातून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी आता सर्वकाही हातात असल्याने मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी करून पाटणची तामकडे एमआयडीसी अद्यावत करावी, अशी मागणीही जनतेतून होत आहे.
…यामुळे, देसाईंना फायदाच होणार!
येत्या वर्षभरानंतर विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच राजकारणातील सतत होणारे फेरबदल, नाराजी, उलट-सुलट आणि मतदारसंघात अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. परंतु, मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्याची केलेली प्रगती ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यातच जर पाटण तालुक्यात मोठे उद्योग आले आणि तरुण व महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला. तर त्याचे श्रेय आणि फायदा देसाईना नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही.