खडकवासला (विशाल भालेराव) – महापालिका हद्दीत गावे समाविष्ट होण्यापूर्वी बहुतांश ग्रामपंचायतींत बोगस नोकरभरती करण्यात आली आहे. या गैरव्यवहारांतून काही कर्मचारी सेवेत समाविष्ट करण्यात आले. यात काही गावांतील सरपंचांचे नाव पुढे येत असून, त्यांच्यावर शासन काही कारवाई करणार का? अशी चर्चा या गावांत रंगली आहे. तर, हे प्रकरण उजेडात आल्याने अनेकांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे.
बोगस भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची नोकरी टिकणार की जाणार यांचीही चर्चा समाविष्ट गावामध्ये आहे. या बोगस भरतीत नोकरी लागण्यासाठी अनेक युवकांनी सावकारी कर्ज काढून संबंधितांकडे लाखो रुपये भरल्याची चर्चा आहे. बोगस भरती कर्मचारी महानगरपालिका सामावून घेणार का नव्याने भरती प्रक्रिया राबवणार याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे. बोगस भरती कर्मचाऱ्यांनी दिलेले पैसे काही जण परत मागण्याच्या तयारीत आहेत. या भरतीच्या चौकशीबाबत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल आता नुकताच समोर आला. त्यात अनेक मुद्दे सविस्तरपणे मांडले आहेत. त्यावर प्रशासन कारवाई करणार, की राजकीय दबावामुळे अहवाल बंद होणार? हेही काहीच दिवसात स्पष्ट होईल.
बोगस भरतीतील झालेला भ्रष्टाचार आता सार्वजनिक झाला आहे. अहवाल सादर करण्यासाठी शासनाने उशीर केला होता. आता कारवाईत उशीर करू नये. तसेच आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भरतीतील आर्थिक देव-घेवीसंदर्भात तक्रार करणार आहे. आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेउन त्यांचे वेतन लवकरात लवकर करावे. – अशोक मते, वरिष्ठ उपाध्यक्ष, सहकार आघाडी पुणे भाजप