पाणी म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली निसर्गदत्त देणगी आहे. प्रत्येकाला पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. अशी पाण्याची महती आपण कित्येकदा ऐकत आलो आहे. पण शरीरात पाण्याची नेमकी भूमिका काय आहे, कोणी किती पाणी प्यावं याचे काही नियम आहेत. शरीरात पाणी कमी असून चालत नाही तसंच अधिक असून चालत नाही.
पाणी हे जीवन आहे, पाण्याशिवाय आपण अधिक काळ जगू शकत नाही, म्हणूनच पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. केवळ मनुष्यच नाही तर प्राणीमात्रांनाही पाण्याची तितकीच गरज असते. पाण्यातून जरी कॅलरीज आणि पोषक तत्त्व मिळत नसली तरी पाण्याला आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. पाणी हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे, हे आता हळूहळू लोकांच्या चांगलंच पचनी पडलं आहे. त्यामुळे गेल्या काही दशकांत शरीराला आवश्यक तेवढं पाणी पिण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येतो. असं असलं तरी अजूनही कित्येक लोक पाण्याच्या महतीपासून वंचित असल्याचं दिसून येतं.
मानवी शरीर हे अन्नाशिवाय काही आठवडे जगू शकतं मात्र पाण्याशिवाय केवळ एकच दिवस राहू शकतं. कारण आपल्या शरीराचा ५० ते ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. रक्त, काही पाचक रस, मूत्र आणि घाम आदी रुपात ते शरीरात असतं. इतकंच नव्हे तर काही प्रमाणात ते स्नायू, चरबी आणि हाडांमध्येदेखील असतं. शरीरात पाण्याचा साठा होत नसल्यामुळे आपल्याला दररोज ताज्या पाण्याची आवश्यकता असते जेणेकरून फुफ्फुसं, त्वचा आणि मल-मूत्र याद्वारे बाहेर पडलेल्या पाण्याचा निचरा भरून निघेल. आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे, हे प्रत्येकाच्या शरीराचा आकार, चयापचय क्षमता, आजूबाजूचं वातावरण, आपण काय अन्न सेवन करतो यावर तसंच आपण कोणकोणत्या उपक्रमांमध्ये सहभागी होतो यावर अवलंबून असतं. अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाच्या वयानुसार पाण्याची पातळी बदलत जाते.
शरीरातील पाण्याच्या पातळीविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी
1. शरीरातील पाण्याची पातळी ही स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. ही पातळी कमी होण्याची क्षमता मात्र वयानुसार बदलत जाते.
2. प्रौढ मंडळींमध्ये दिवसाला २.५ ते ३ लिटर पाण्याची पातळी घटते. गरम होत असल्यास किंवा व्यायाम केल्यास पाण्याची पातळी कमी होते.
3. ज्येष्ठांमध्ये दिवसाला २ लिटर इतकी ही पातळी घटते.
4. विमानातून प्रवास करणा-या मंडळींमध्ये तीन तासांच्या विमान प्रवासात अंदाजे १.५ लिटर पातळी घटते.
5. पाण्याची घटलेली पातळी भरून काढण्याची नितांत गरज असते.
पाणी का प्यावं?
1. पेशींचं आरोग्य आणि त्यांची अखंडता तशीच राहावी म्हणून
2. नलिकांमधून रक्तप्रवाह सुरळीत व्हावं म्हणून
3. चयापचय क्रिया, अपचन किंवा मूत्रावाटे होणारी शरीराची झीज भरून काढण्यासाठी.
4. अति घाम आल्याने शरीराचं तापमान बदलतं. त्या तापमानाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी.
5. सांध्यांमधलं वंगण टिकवून त्यांचं कार्य नियमित सुरू ठेवण्यासाठी.
- मूत्राशयाचं कार्य नियंत्रित ठेवण्यासाठी.
- पचनक्रियेला साहाय्य करणे आणि बद्धकोष्ठतेला प्रतिबंध घालणे.
- त्वचेचा पोत सुधारण्यासाठी त्वचेची आद्र्रता टिकवून ठेवणे.
- शरीरासाठी आवश्यक असलेली पोषकतत्त्व आणि प्राणवायू पेशींपर्यंत पोहोचवणे.
-
शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवणे आणि मेंदूचं कार्य सुधारणे.
-
वजन कमी करण्यासाठी साहाय्य करते.
- मूत्राशय किंवा कोलोरेक्टल कॅन्सरपासून बचाव होण्यासाठी.
- शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा करून मूत्रसंसर्गापासून शरीराचं संरक्षण करणं.
- मुरगळणे किंवा लचक भरणे याला प्रतिबंध आणते.
- तुम्हाला आनंदी ठेवते.