चंडीगढ -पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी संघर्षाच्या मूडमध्ये असलेले मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी गुरूवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. दरम्यान, अमरिंदर यांनी मंत्रिमंडळात बरेच फेरबदल केले. त्यानुसार सिद्धू यांच्या खात्यातही बदल करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंजाब मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक झाली. त्या बैठकीला सिद्धू अनुपस्थित राहिल्याने त्यांचे आणि अमरिंदर यांच्यातील मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले. पंजाबमध्ये सत्तेवर असूनही त्या राज्यातील शहरी भागांत कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता येऊ शकली नाही.
त्याचे खापर स्वत: अमरिंदर यांनी सिद्धू यांच्यावर फोडले आहे. सिद्धू त्यांच्याकडे असलेल्या शहरी विकासाशी निगडीत स्थानिक प्रशासन खात्याला योग्य न्याय देऊ शकले नाहीत, असे अमरिंदर यांनी नुकतेच म्हटले होते. एवढेच नव्हे तर, सिद्धू यांचे खाते बदलण्याचे संकेतही त्यांनी त्यावेळी दिले.
त्यापार्श्वभूमीवर, मंत्रिमंडळ बैठकीनंतर अमरिंदर यांनी फेरबदल करताना अनेक मंत्र्यांचे खाते बदलले. त्यातून सिद्धूही सुटले नाहीत. सिद्धू यांच्याकडील महत्वाच्या स्थानिक प्रशासन आणि पर्यटन खात्यांची जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यांच्याकडे आता ऊर्जा खाते सोपवण्यात आले आहे.