नवी दिल्ली – विविध कंपन्यांच्या वाहनांचा पुरवठा कमी झाल्यामुळे वाहनासाठीचा वेटिंग पिरियड बराच वाढला आहे. याचा परिणाम एकूणच मागणी कमी होण्यावर होऊ शकतो अशी भीती वाहन उत्पादक व्यक्त करू लागले आहेत. गेल्या वर्षी वाहनासाठी आवश्यक असलेल्या सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विविध वाहनाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
गेल्या काही महिन्यापासून सेमीकंडक्टरचा तुटवडा काही प्रमाणात कमी झाला असला तरी परिस्थिती आणखी पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. याबाबत बोलताना मारुती सुझुकी इंडिया या कंपनीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, सध्या आमच्याकडे 2.5 लाख वाहनांची नोंदणी झालेली आहे.
मात्र आम्ही ही वाहने तात्काळ पुरवू शकत नाहीत. आमचे उत्पादन अपेक्षेपेक्षा 20 टक्क्यांनी कमी झाले आहे. ग्राहक विविध वाहनासाठी विचारणा करत आहेत किंवा मागणी नोंदवीत आहेत. मात्र या ग्राहकांना तात्काळ वाहनाचा पुरवठा न झाल्यास त्यांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे वाहनांची चौकशी कमी होईल की काय अशी भीती आमच्या मनात निर्माण झाली आहे. सध्या विविध मॉडेलसाठी काही आठवड्यापासून काही महिन्यापर्यंतचा वेटींग पिरीएड आहे. मात्र आतापर्यंत तरी सुदैवाने कोणी बुकिंग कॅन्सल केलेले नाही.
आम्ही प्रत्येक आठवड्याला प्रत्येक ग्राहकाला फोन करून त्यांच्या बुकिंग संदर्भात काय परिस्थिती आहे आणि त्यांचे वाहन कधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे त्यासंदर्भात माहिती देत आहोत. कंपनीसमोरील अडचणी बरेच ग्राहक समजून घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, जागतिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक व सेमीकंडक्टकरच्या वस्तू आता कार कंपन्यांना बऱ्याच प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. दरम्यानच्या काळामध्ये ओमायक्रॉन आल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडलते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. हा परिणाम फक्त भारतातील कंपन्यावर होत नाहीत तर जागतिक पातळीवर वाहन उत्पादकतासमोर हा प्रश्न निर्माण झालेला आहे.