जामखेड – विधानसभेच्या निवडणुकीला अवघ्या 25 दिवसांवर येऊन ठेपला आहे. निवडणूक म्हणजे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी एक उत्सवच असतो. प्रचार फेऱ्या, सभा, गावोगावी भेटी असा मोठा लवाजमा प्रत्येक पक्षाकडून निवडणूक काळात असतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र प्रचारासाठी जेमतेम 12 दिवस मिळणार आहेत.
यामुळे एकीकडे उमेदवारीसाठी मॅनेजमेंट आणि दुसरीकडे यंत्रणा राबवून प्रचार पूर्ण करण्याची कसरत करताना इच्छुकांची चांगलीच धावपळ उडत आहे. त्याचबरोबर अत्यल्प कालावधी असल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. लोकसभा, विधानसभा यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हटले की प्रचार हा आलाच. प्रचारासाठी गाड्यांचे ताफे, गावोगावी भेटी, दुचाकी प्रचार फेऱ्या, सभा, झेंडे, बॅनर, रॅली, नारे, बैठकांसह विविध बाबी निवडणूक प्रचारात असतात.
यामध्ये आणखी एक भर पडली ती सोशल मीडियाची. कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जिवाचे रान करतात. या काळात सर्वच बाबी बाजूला सारून केवळ प्रचारासाठी वाहुन घेणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या काळात प्रचंड उत्साही असतात. इतरवेळी कार्यकर्त्यांना फारसे महत्व नसते. मात्र निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते नेत्यांच्या गळ्यातील ताईत असतात. प्रचार काळातच नेते मंडळीकडून कार्यकर्त्यांची काळजी घेतली जाते. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय ठेवली जाते. प्रचाराचा काळ कार्यकर्त्यांसाठी उत्सवाचाच काळ असतो.
यंदाचा हा उत्सव काळ अवघ्या 12 दिवसांचा आहे. अल्पकालावधीत सर्व गावांमध्ये पोहचणे, प्रचाराचे नियोजन, सभा, रॅली, नाराजांची मनधरणी, मोठ्या नेत्यांच्या सभा असे सर्व नियोजन करून दहा ते अकरा दिवसांत प्रचार पूर्ण करण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. त्यातच प्रचार रथ, भोंगा, विविध ठिकाणी लावावयाचे बॅनर, सभा, परवानगी, प्रचार साहित्याचे नियोजन, सोशल मीडियावर प्रचाराचे प्रमाणपत्र यासह इतरही बाबींची पूर्तता करावी लागते.