मुंबई : जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानाकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली असून यात ४ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गोळीबार केल्यानंतर आरपीएफ जवान चालत्या रेल्वे गाडीतून उडी मारून फरार झाला होता मात्र त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई (गाडी क्र. १२९५६) ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन कुमार याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
#WATCH | Mumbai: DRM Neeraj Kumar says, “At around 6 am we got to know that an RPF constable, who was on escorting duty opened fire…Four people have been shot dead…Our railway officer reached the spot. The families have been contacted. Ex-gratia will be given.” pic.twitter.com/Zl7FfoUd8i
— ANI (@ANI) July 31, 2023
गोळीबार केल्यानंतर बोरिवली स्थानकापूर्वी गाडीचा वेग मंदावल्यानंतर आरपीएफ जवान चेतन गाडीमधून उडी टाकून फरार झाला होता. यानंतर ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली असून, ४ जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपी आरपीएफ जवान चेतनला भाईंदरमध्ये अटक करण्यात आली आहे.
याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आरपीएफ जवानाने गोळीबार केल्याची माहिती सकाळी ६ वाजता आम्हाला मिळाली. या घटनेनंतर आमचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्यात येत आहे.”