पेशावर – पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुन्वा प्रांतात विवाहाशी संबंधित वादातून एकाच कुटुंबातील 8 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मलाकांद जिल्ह्यातील बतखेला तालुक्यात ही घटना घडली.
मृतांमध्ये 3 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. झोपेतच असताना त्यांच्याच नातावाईकांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार करून त्यांटी हत्या केली. असे पोलिसांनी सांगितले. या सामुदायिक हत्येमागे विवाहाबाबतच्या वादाचे कारण होते. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
या हत्याकांडाबाबतची माहिती मिळताच निमलष्करी दल घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी बातखेला येथील रुग्णालयात नेण्यात आले.
मारेकऱ्यांना पकडण्यासाठी जिल्ह्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करण्याची सूचना प्रभारी मुख्यमंत्री मुहम्मद आझम खान यांनी पोलिसांना केल्या आहेत.