नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सत्ता मिळविल्यानंतर पंजाबमध्येही स्पष्ट बहुमताचं सरकार स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये आम आदमी पक्षात सामील होण्यासाठी नेत्यांची रिघ लागली आहे. मात्र दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून तीन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनुप केसरी, संघटनात्मक जबाबदाऱ्या हाताळणारे संगठन महामंत्री सतीश ठाकुर आणि इकबाल सिंह हे ३ नेते भाजपमध्ये दाखल झाले.
दिल्लीत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी एक विशेष कार्यक्रम झाला. याप्रसंगी नड्डा आणि केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री तसेच हिमाचल प्रदेशचे भाजप अध्यक्ष अनुराग ठाकुर उपस्थित होते. भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान होतो म्हणून ‘आप’चे नेते भाजपमध्ये दाखल होत असल्याचे अनुराग ठाकुर म्हणाले.
आम आदमी पार्टीत अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान या दोन नेत्यांनाच महत्त्व आहे. हिमाचल प्रदेशमधील ‘आप’चे सर्व नेते आणि पदाधिकारी यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केले आहे. केजरीवाल यांची भेट मिळणे तर दूरच हिमाचलचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वेळच नाही. यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे अनुप केसरी, सतीश ठाकुर आणि इकबाल सिंह यांनी सांगितले.