खंडाळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले हा लोकशाहीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केली. संजय राऊत यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होते, त्याकडे दुर्लक्ष झाले. माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांवर अन्याय झाला. पक्षाला शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळेल अशु खात्री होती, असेही जाधव यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले.
भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा आहे. त्याउलट, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दृष्टीने तो निर्णय अतिशय धक्कादायक आहे. स्थापनेपासून शिवसेना म्हणजेच ठाकरे असे समीकरण होते. शिवसेना ठाकरेंचीच ही ओळख निवडणूक आयोगाच्या निर्णयाने पुसली जाणार आहे. यापुढे शिवसेना हा शिंदेंचा पक्ष म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे शिवसेनेबाबत देण्यात आलेला निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील ठळक घडामोडींपैकी एक म्हणून कायम कोरला जाईल. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.