पाथर्डी (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिराळ येथे शेतीच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी गोळीबार झाल्याची माहिती पुढे येत आहे. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार आज दुपारी शिराळ-मिरी रस्त्यावर घडला. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
सदर घटनेत बंदुकीतून गोळ्या झाडल्याची चर्चा आहे. या घटनेत दोन्ही गटांकडून काठ्या, कुऱ्हाडी व तलवारीचा वापर झाल्याने अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजते. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. त्यांच्यासमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी घटनास्थळी उपस्थित होते.
गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे डॉग स्कॉड व बॉम्बशोधक पथकाने ही घटना स्थळीभेट देऊन तपास केला. शेतीच्या वादातून मारामारी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून सांगितली जात आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत पाथडी पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता. दोन्ही गट वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे असल्यामुळे पोलिसांकडून त्या पार्श्वभूमीवर तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव असून, मोठा पोलिसांचा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानंतरच घटनेचे नेमके कारण पुढे येणार असले, तरी घटनेला जुन्या वादाची किनार असल्याची परिसरात चर्चा आहे.