नवी दिल्ली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने पक्षावर हक्क सांगितला असून पक्षचिन्हाची लढाई निवडणूक आयोग ते सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे.
याप्रकरणी आधी झालेल्या सुनावणीत “खरी शिवसेना कोणाची’, याचा निवाडा भारतीय निवडणूक आयोग करेल, असे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने म्हटले होते. पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडून केला जाणार असला तरी आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत न्यायालयात निर्णय होणार आहे. यासंदर्भात उद्या 1 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
ही सुनावणी होण्यापूर्वी अजूनही कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठाकरे आणि शिंदे गटाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. आजही हजारोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्रांचे बॉक्स निवडणूक आयोगाकडे दाखल झाले आहेत.
राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टातील पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे.