मुंबई – महाराष्ट्रातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचार करायला हवा, असे म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. राज ठाकरे यांनी मुंबईत मनसेची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि देशातील प्रत्येक राज्य त्यांच्या समान मुलांसारखे असायला पाहिजे, हे माझे पहिल्यापासून मत आहे. म्हणजे महाराष्ट्रातला प्रकल्प बाहेर जात असता आणि समजा आसामला गेला असता, तर मला वाईट नसते वाटले. म्हणजे आजही टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला याचेही मला काही वाटत नाही. कारण तो देशातच आहे. पण वाईट एवढ्याचेच वाटते की, महाराष्ट्रात जो प्रकल्प येतोय आणि बाहेर जातोय तो गुजरातमध्ये जातोय. त्यामुळे मला असे वाटते पंतप्रधानांनी स्वत:हून याकडे लक्ष दिले पाहिजे.
पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. तो सगळ्या देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठे झाले पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजे. तिकडच्या लोकांना तिथून बाहेर जायची आणि दुसऱ्या राज्यावर ओझं बनण्याची गरज नाही, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र हा नेहमेची उद्योगधंद्याच्या बाबतीत प्रगती पथावर राहिलेला आहे. तसेच, उद्योगपतींनाही महाराष्ट्र हेच राज्य त्यांचे प्रथम क्रमांकाचे राज्य वाटत आले आहे. त्यामुळे याकडे राजकीय दृष्ट्या न पाहता, पंतप्रधानांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही मत राज ठाकरेंनी मांडले.