गडचिरोली :- आम्ही दोघे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) गेल्या वर्षभरापासून काम करत होतो. आता अजित पवार आले आहेत. आम्ही एक त्रिशूळ तयार केले आहे. हे विकासाचे त्रिशूळ आहे.
हे त्रिशूळ राज्यातील गरिबी आणि मागासलेपण दूर करेल. हे त्रिशूळ शंकरासारखे आहे. जे भोळे आहे, परंतु जे लोक या महाराष्ट्रात जनसामान्यांच्या विरोधात काम करतील, त्यांच्यासाठी तिसरा डोळा बनून त्यांना खाक करणारे त्रिशूळ आहे. आमच्या तिघांच्या माध्यमातून तुम्हाला हे त्रिशूळ पहायला मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गडचिरोली येथे आयोजित “शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार आणि भाजप, शिवसेने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे नुतन साथी असलेले, पण जुने मित्र असलेले अजित पवार या सरकारमध्ये नुकतेच सहभागी झाले आहेत. आज आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत आलो आहोत. तीन दिवसांपूर्वी आपल्या राष्ट्रपतीदेखील येथे आल्या होत्या. आपल्या भारताच्या लोकशाहीचे सौंदर्य काय आहे बघा.
देशातल्या एका छोटाशा गावातील आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू या आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. आपल्या राष्ट्रपती आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे देशाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासासाठीच हा निर्णय – अजित पवार
विकासासाठीच राष्ट्रवादीने युती सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आज गडचिरोली जिल्ह्यात रिकाम्या हाताने आलेले नाहीत, तर काहीतरी घेऊन आले आहेत. हे सरकार जनतेसाठी आहे. शेवटच्या माणसाला सरकारी योजनांचा लाभ मिळावां हेच महायुती सरकारचे लक्ष आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचारचे असले तर चांगली काम होतात, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.