सणसवाडी -शिक्रापूर ते कान्हूर कवठे रस्त्याच्या कामाविषयी सुरुवातीपासूनच अनेक गावचे ग्रामस्थांच्या तक्रारी असून हे काम चांगले व्हावे, अशी मागणी कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, हिवरे कुंभार, खैरवाडी, पिंपळे धुमाळ, कवठे येमाई व शिक्रापूर ग्रामस्थांची आहे. शिक्रापूर ते कवठेपर्यंतचे 23 किलोमिटरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून पहिल्या पावसातच खड्डे पडून डांबर गायब झाल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.
या कामास 3 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे व काम मार्च 20 अखेर पूर्ण होणे अभिप्रेत होते. पण अर्धेही झाले नाही. मिडगुलवाडी, कवठे-कान्हूर ग्रामस्थांनी अनेकदा ठेकेदारास दाखवून दिले; पण त्याने दाद दिली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता चौरे यांनी हिवरे येथे बाजार मैदानावर बैठक घेतली.
यावेळी ठेकेदार लाकूडझोडे, माजी सरपंच राहूल टाकळकर, माजी सरपंच राजाराम गायकवाड खैरेवाडीचे दतोबा गोडसे, कान्हूर मेसाई विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर पुंडे, सरपंच शिर्के व हिवरेचे ग्रामस्थ उपस्थित होते. ठेकेदार लाकूडझोडे व पर्यवेक्षक यांनी शेतकऱ्यांनी रस्त्यावर पाणी येऊ दिल्याने रस्ता उखडल्याची माहिती दिली.
त्यासाठी शासनाने कडेचे पाणी जाण्यास चारीसाठी नियोजन करावे व नंतर पाइपलाइन टाकून रस्ता फोडण्याऐवजी ज्यांना पाइपलाइन करायची असेल त्यांनी आधीच पाइप गाडून घ्यावेत, अशी सूचना केली. यावेळी कामाचे दोष काढून सुधारणा करून उत्तम काम करण्याची ग्वाही कंत्राटदार व अभियंता यांनी उपस्थितांना दिली.