नांदेड – देशातील काही भागातील शेतकऱ्यांची स्थितीफार हलाखीची आहे. यातच शेतकरी तरुणांच्या लग्नाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुली मिळत नसल्याने अनेक ठिकाणी तरुण शेतकऱ्यांनी विविध पद्धतीने आंदोलन केले. अनेक मुलींची शेतकरी नको तर नोकरदार मुलगा हवा, अशी मागणी असते. मात्र नांदेडमधील एका उच्चशिक्षित तरुणीने या सर्व गोष्टींना छेद देत शेतकरी नवरा हवा अशी मागणी आपल्या वडिलांकडे केली. तिची ही इच्छा तिच्या वडिलांनी पूर्णही केली आहे.
वैष्णवी कदम असे या तरुणीचं नाव आहे. वैष्णवीने तीन शाखांमधून पदवीचं शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली. तिला मोठ्या घरातील लग्नासाठी चांगली स्थळ येण्यास सुरुवात झाली होती. मात्र तिने शेतकरी नवऱ्यासोबतच लग्न करणार असल्याचा हट्ट केला. त्यानंतर वडीलांनी तिच्या मनासारखं स्थळ शोधून काढलं. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील नितीन पाटील या शेतकरी युवकाशी वैष्णवीचं तिच्या कुटुंबियांनी लग्न ठरवलं आहे. नितीन पाटील असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडे पंधरा एकर शेती आहे. आज 9 जुलै रोजी या दोघांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
दरम्यान, आई-वडील आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून, जावई नोकरीवाला आणि शहरातील असलेला शोधतात. त्यामुळे ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्यास कोणी तयार नसते. मुलगी डॉक्टर असेल तर मुलगा डॉक्टरच शोधतात. ठराविक क्षेत्रात नोकरी करणाऱ्या मुलीला त्याच क्षेत्रात नोकरी करणारा मुलगा शोधला जातो. यामुळे ग्रामीण भागांत शेतकरी मुलांना सहसा मुलींचं स्थळ भेटणं अवघड झालं आहे. महानगरात राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुली शक्यतो शहरी मुलांसोबत लग्न करण्यास प्राधान्य देत आहेत. परंतु, वैष्णवीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.