मुंबई – गेल्या महिन्यामध्ये आयपीओ आलेल्या पेटीएम कंपनीचा शेअर सोमवारी तब्बल 13 टक्क्यांनी कोसळला. रिझर्व्ह बॅंकेने गेल्या आठवड्यात पेटीएम कंपनीला नवी खाती उघडण्यास मज्जाव केला आहे.
पेटीएम कंपनीची स्थापना मे 2017 मध्ये झाली तेव्हापासून रिझर्व बॅंकेने या कंपनीवर तिसऱ्या वेळी कारवाई केली आहे.
त्याचबरोबर स्मॉल फायनान्स बॅंक म्हणून काम करीत असलेल्या एटीएमला दुसऱ्यांदा खाते उघडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रिझर्व बॅंकेने या निर्णयाची अंमलबजावणी लगेच करण्यास सांगितले असून माहिती तंत्रज्ञान ऑडिट करण्यास सांगितले आहे.
ऑडिटरची नियुक्ती रिझर्व बॅंकेशी चर्चा करून करण्याची सूचना रिझर्व्ह बॅंकेने केली. ऑडिटरचा निकाल रिझर्व बॅंकेला सादर करण्यास सांगण्यात आले असून त्या आधारावर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पेटीएमच्या शेअर बाजारावरील नोंदणीवेळी कंपनीचे बाजार मूल्य एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.
आता या शेअरची घसरण होत असल्यामुळे या कंपनीचे बाजार मूल्य केवळ 57 हजार कोटी रुपये इतके झाले आहे. या कंपनीला खातेदारांची संख्या वाढवण्याची गरज असताना आता रिझर्व्ह बॅंकेने घातलेल्या प्रतिबंधामुळे खातेदारांची संख्या पुरेशा वेगाने वाढणार नाही असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
विजय शंकर शर्मा यांचे या कंपनीमध्ये तब्बल 51 टक्के इतके भांडवल आहे. शेअर बाजारात कंपनीची होत असलेली घसरण रोखण्यासाठी आता कंपनीला परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे समजले जात आहे.
………