मुंबई – गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने पेटीएम बँकेवर निर्बंध जाहीर केले होते. त्यानंतर तीन दिवस या बँकेच्या शेअरचा भाव मोठ्या प्रमाणात कोसळला होता. मात्र नंतर दोन दिवस या कंपनीच्या शेअरच्या भावात बरीच वाढ झाली. पुन्हा गुरुवारी पेटीएम कंपनीची पालक कंपनी असलेल्या वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन या कंपनीच्या शेअरच्या भावात दहा टक्क्यांनी घट झाली.
आता या कंपनीच्या शेअरचा भाव 447 रुपयावर आला आहे. त्यामुळे या कंपनीचे बाजार मूल्य 3,153 कोटी रुपयांनी कमी होऊन 28,394 कोटी रुपये इतके झाले आहे. दोन दिवस या कंपनीचे पुनरुज्जीवन होईल असे गुंतवणूकदारांना वाटत होते. मात्र आज या संबंधात रिझव्हर्र् बँकेने बळीच बरीच कठोर भूमिका जाहीर केल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी शेअरची विक्री केली असल्याचे दिसून येते.
पतधोरण जाहीर करताना पत्रकारांनी पेटीएमबद्दल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना बरेच प्रश्न विचारले. यावेळी बोलताना दास म्हणाले की, पेटीएम कंपनीकडून अनेक नियमाची अंमलबजावणी होत नव्हती. यासाठी रिझर्व्ह बँकेने पेटीएमला वारंवार विचारला गेली होती. मात्र या नियमाच्या अंमलबजावणीकडे पेटीएमने दुर्लक्ष केल्यामुळे रिझर्व्ह बँकेला या कंपनीवर कठोर कारवाई करावी लागली.
भारताने डिजिटल पेमेंट क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. यामध्ये पेटीएमने महत्त्वाची भूमिका अदा केली आहे. मात्र असे असले तरी नियमाचा भंग केल्यानंतर अशा प्रकारची कारवाई करावी लागते. तसेच डिजिटल पेमेंट व्यवस्थेत फार मोठी अडचण निर्माण होणार नाही याची रिझव्हर्र् बँकेला खात्री आहे. या क्षेत्रावर रिझर्व बँकेचे बारीक लक्ष आहे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान पेटीएमने रिझर्व्ह बँकेकडे कारवाई मवाळ करण्याबाबत विचारणा केली असल्याचे समजले जाते. मात्र या संबंधात रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ अधिकारी कारणावर हात ठेवत आहेत. यासंदर्भात पेटीएम व इतर काही स्टार्टअप कंपन्यांनी अर्थ मंत्रालयाकडे ही कारवाई मवाळ करण्यासंदर्भात युक्तिवाद केला होता. मात्र अर्थ मंत्रालयातील अधिकार्यांनी हा प्रश्न रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील आहे असे सांगून यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला असल्याचे समजले जाते.
त्यामुळे आता पेटीएम कंपनीचे काय होणार याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात अस्वस्थता आहे. सुरुवातीला पेटीएम कंपनीने यातून मार्ग निघेल असे सांगितले होते. मात्र परिस्थिती त्यानंतर नकारात्मक होत आहे. त्यामुळे आगामी काळात पेटीएमबाबत आणि डिजिटल पेमेंटबाबत काय घडामोडी होतात याकडे गुंतवणूकदारांचे आणि सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.