पाटण (प्रतिनिधी) – सातारा हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जिल्हा आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असेल. या मतदारसंघात यशवंत विचारांचा उमेदवार निवडून आणू, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
महाविकास आघाडीचा संवाद मेळावा पाटण येथे रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आ. बाळासाहेब पाटील, युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,
शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख हर्षद कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस हिंदुराव पाटील, नरेश देसाई, शेतकरी संघटनेचे शंकर गोडसे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब भोळे, अजित पाटील-चिखलीकर, राजाभाऊ शेलार, सुरेश पाटील यांची उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारचे दबावतंत्र सुरू आहे. काँग्रेसला प्राप्तिकराच्या दंडाची नोटीस काढली आहे. पक्षाचे जेवढे उत्पन्न नाही, त्याहून अधिक दंड ठोकावला आहे. पक्षाचे बँक खाते गोठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास ढळला आहे.
2019 साली जे घडले, ते आता घडणार नाही. अच्छे दिन, पंधरा लाखांचे आमिष दाखवून लोकांना फसवले आणि बेरोजगारी, महागाई डोक्यावर आणून ठेवली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ देऊन हुकुमशाहीला आळा घालायचा आहे. हे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास देशाची वाट लागेल. आताची निवडणूक कदाचित शेवटची ठरू शकते. त्यामुळे ’भाजप हटाव’ भूमिका घेतली पाहिजे.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, देशात दबावतंत्राने लोकांना, पक्षांना, राजकीय पदाधिकार्यांना आपलेसे केले जात आहे. लोकसभा निवडणूक हे मोठे आव्हान आहे. निवडणुकीचे वातावरण अजून तापलेले नाही. मात्र, जिल्ह्यातील वातावरण पाहता शरद पवार यांच्या निर्णयाला खंबीर साथ देण्यात येणार आहे. डॉ. पाटणकर म्हणाले आम्ही इंडिया आघाडीच्या 17 उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत. हे सरकार जात व्यवस्थेवर चालणारे आहे. हे सरकार भांडवलदारांचे, जातीयवादी, आरएसएसचे आहे.
विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, समाजात गोंधळ घालण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. नको असलेले मुद्दे समाजासमोर मांडण्याचे कौशल्य काही लोकांकडे आहे. महागाई, बेकारी, बेरोजगारी हे प्रश्न अडगळीत पडले आहेत. सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर, हर्षद कदम, अजित पाटील-चिखलीकर, आबासाहेब भोळे, सचिन जाधव यांची भाषणे झाली. मेळाव्यास महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.