कराड (प्रतिनिधी) – जबरी चोरीच्या गुन्ह्यात रॉयल उर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा (रा. वसई, जि. पालघर), विजय शंकर पवार (रा. मोळाचा ओढा, सातारा) आणि रवींद्र गोरखनाथ निकम (रा. गोळीबार मैदान, गोडोली, सातारा, मूळ रा. जांब बुद्रुक, ता. कोरेगाव) यांना कराड न्यायालयाने आठ वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली, तर अनुज गंगाराम चौगुले (रा. सात रस्ता, मुंबई) याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अकबर सलीम खाटिक व त्यांचा चालक रफीक मेहबूब शेख हे महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप (एमएच-50-5196) मधून 15 एप्रिल 2016 रोजी चिपळूण-कराड रस्त्याने निघाले होते. त्यांची गाडी रात्री 9.15 च्या सुमारास वाजेगाव, ता. पाटण येथील पुलावर आली असता, पाठीमागून एक चारचाकी गाडी आली.
त्या गाडीच्या चालकाने खाटिक यांना गाडी आडवी मारली. त्या गाडीतून चार जण खाली उतरले. त्यांनी शेख यांच्याकडे रोख रकमेबाबत विचारणा केली. त्यानंतर शेख यांचा शर्ट फाडून आणि त्यांना मारहाण करून, बनियनमध्ये लपवून ठेवलेले एक लाख तीस हजार रुपये चौघांनी काढून घेतले. त्यातील दोघांनी हातोड्याने पिकअपची काच फोडून सुमारे दहा हजारांचे नुकसान केले. या टोळीतील एकाकडे रिव्हॉल्व्हर होते. या घटनेत रिव्हॉल्व्हरमधील एक काडतूस पिकअपच्या मागील बाजूच्या चाकाजवळ पडले होते. गुन्हा केल्यानंतर चौघे गाडीतून पसार झाले. याबाबत शेख यांच्या फिर्यादीवरून कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पाटणच्या पोलीस उपअधीक्षक नीता पडवी आणि कोयनानगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम वाळके यांनी या गुन्ह्याचा तपास करून, चौघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध कराड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यू. एल. जोशी यांच्यासमोर झाली.
या खटल्यात 13 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद, साक्षी, पुरावे ग्राह्य धरून, जोशी यांनी तिघांना भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 392, 394, 34 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये रॉयल सिक्वेरा, विजय पवार आणि रवींद्र निकम यांना आठ वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून सरकारी वकिलांना सहकार्य केले.