मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी पहाटेच्या शपथविधीने संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. दरम्यान, आजपर्यंत या शपथविधीवर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर अनेक दावे-प्रतिदावे देखील करण्यात आले. मात्र या शपथविधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
शरद पवार यांनी ‘पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली’ असे म्हटले आहे. महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यामुळे चांगली गोष्ट एकच घडली की राष्ट्रपती राजवट उठली असे शरद पवार म्हणाले आहेत.
एवढंच नाही जेव्हा राजकारणात विश्वासघात होत असतो आणि तुमच्यापुढे पर्याय उपलब्ध असतो तेव्हा चेहरा बघत बसायचा नसतो असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. या सगळ्यावर विचारले असता शरद पवारांनी मात्र देवेंद्र फडणवीस हे असत्याची बाजू घेत बोलत असल्याचे म्हटले. मात्र आता पहाटेचा शपथविधी झाल्यामुळे एकच चांगले झाले राष्ट्रपती राजवट उठली असे त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून २३ नोव्हेंबर २०१९ ला झालेला पहाटेचा शपथविधी चांगलाच चर्चेत आहे. या सगळ्याची शरद पवार यांना कल्पना होती असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र ते असत्य असल्याचे शरद पवार म्हणाले होते. आता आज त्यांचे नवं वक्तव्य समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला होता. तसंच या सगळ्याची बोलणी थेट शरद पवारांशी झाली होती. त्यांना आम्ही शपथ घेणार हे माहित होते. त्याचप्रमाणे त्यांच्या संमतीनेच सगळं झालं होतं. पण नंतर त्यांनी धोका दिला असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.