हवेलीतील सभेत शरद पवार गरजले
उरुळी कांचन/योगेश मारणे : लष्कराने केलेल्या कामाचे श्रेय मोदी सरकार फुकटात लाटत आहे. आम्ही असे कधी केले नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या आणि लष्कराच्या कामाचे श्रेय लाटणाऱ्या या सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते.ते म्हणाले, कलम ३७० प्रमाणेच मोदी सरकारने कलम ३७१ रद्द करुन दाखवावे. त्यालाही आम्ही पाठींबा देऊ. मोदी सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आमचाही पाठिंबा होता. मात्र फक्त काश्मीर मधील जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा, अशी आमची मागणी होती. सगळ्याच गोष्टीचे राजकारण करणाऱ्या मोदी सरकारला कलम ३७० वरुन राजकारण करायचे होते. त्यामुळेच त्यांनी अन्य सर्वच पक्षांना राष्ट्रदोही ठरवले आणि देश पातळीवर घाणेरडे राजकारण केले. अशाच प्रकारचे कलम ३७१ हे ईशान्येकडील राज्यांसंदर्भात आहे. तेहि मोदी सरकारने रद्द करुन दाखवावे, असे आव्हान पवार यांनी दिले.
सर्वपक्षीय बैठकीत हिंदुस्थानने पुलवामा दहशतवादी तळावर हल्ला करावा.असा सल्ला मीच मोदी सरकारला दिला होता. त्यानुसार हिंदुस्थानच्या हवाई दलाने कारवाई करुन पुलवामा दहशतवादी तळ उध्वस्त केला. हे आम्ही कधी सांगितले नाही. मात्र,जे काम आपले लष्कर करते त्याचे श्रेय मोदी सरकार विनाकारण घेत आहे.
प्रदीप कंद यांना एकदम पद दिले हि आमची चुक
दिवंगत विद्याधर कंद आणि माझे खूप घनिष्ठ संबंध होते.आम्ही दोघांनी एकमेकांना खूप मदत केली. त्यामुळेच पुढे प्रदीप कंदला, मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष केला.ते करायला नको होते. प्रदीप कंदला खालच्या पातळीपासून काम करायला लावले पाहिजे होते. ही आमची चूक झाली असे शरद पवार यावेळी म्हणाले.
सध्याचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. त्यांना शेतकऱ्यांचे काहीही घेणे-देणे नाही. या सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने एकही निर्णय घेतलेला नाही. सहकार मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे लोकांच्या हिताचे राज्य घडवण्यासाठी ही विधानसभा निवडणूक महत्वाची अआहे, असे पवार म्हणाले.
माजी आमदार अशोक पवार सरकारवर टीका करताना म्हणाले, सरकारने साखर कारखानदारी अडचणीत आणली आहे. सरकार फक्त विकासाच्या गप्पा मारत आहे. प्रत्यक्ष विकास कोठेही झालेला नाही.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, जेष्ठ नेते के. डी. कांचन, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवीदास भन्साळी, देवीदास कांचन यांची भाषणे झाली. यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के, अशोक काळभोर, माधव काळभोर, रवींद्र काळे, दिलीप वाल्हेकर व शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.