कन्नड -सायगाव: फडणवीस सरकारला नवे रोजगार तर निर्माण करता आलेच नाहीत. पण महाराष्ट्रात जो रोजगार होता तो देखील आता बंद झाला. बेकारीची कुऱ्हाड आमच्या तरुणांवर कोसळली असल्याचे जयंत पाटील म्हणाले. विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील चिकलठाणा येथील सभेत बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, कर्जमाफीच्या मुद्द्यावर गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील विधानसभा सर्वाधिक वेळा बंद पडली. याच मुद्द्यावर सरकारशी भांडताना सत्ताधारी पक्षाने आमच्या अनेक आमदारांना निलंबित केले. जी सरसकट कर्जमाफी फडणवीस सरकारला पाच वर्षात द्यायला जमली नाही. ती सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. शेतकऱ्याचे शेती संबंधित कोणत्याही प्रकारचे कर्ज थकलेले असेल, तर त्याला सरसकट कर्जमाफी आमचे सरकार येताच देण्यात येईल.
भाजपवर टीका करताना पाटील म्हणाले, पाच वर्षात घरगुती व शेतीसाठी आवश्यक वीजेचे दर पाच वेळा वाढविण्याचे पाप या सरकारने महाराष्ट्रात केले. या भारतातील कोणत्याही कानाकोपऱ्यात तिथल्या शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळाले. तर शेतकऱ्याच्या शेती मालाला पर्याय म्हणून ताबडतोब परदेशातून माल आणायचा आणि त्या किंमती पाडायच्या, हा नवा उद्योग मोदी सरकारने सुरु केला आहे. यासाठी सहा सचिवांची केंद्रीय समिती नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वीच दिल्लीमध्ये स्थापन केली.