कल्याण जाधव (संस्थापक अध्यक्ष, केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट)
शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस 12 डिसेंबरला मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आलेला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळातील अपवाद वगळता साहेबही लोकांना या दिवशी भेटायला उत्सुक असायचे! यंदा पवार साहेब वयाची 81 वर्षे पूर्ण करीत आहेत. तरीही तोच जोम, उत्साह आणि पायाला भिंगरी लावून राज्यात आणि देशभर फिरणारा हा महान नेता शरीराने थकला तरी मनाने तरुणच राहिला. यामागे त्यांची बहुजन आणि शेतकरी शोषित वर्गाच्या कल्याणचा ध्यास ही प्रेरणा आहे. त्यामुळे त्यांना बळ मिळते.
बारामतीचे पवारसाहेब शेजारच्या पुरंदरचेही तेवढेच आहेत. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत पुरंदरने साहेबांना बारामतीपेक्षा जास्त मताधिक्य दिले होते. त्यावेळी मी कॉलेज करीत स्वतःचा छोटा बांधकाम व्यवसाय सुरू केला होता आणि माझे साकुर्डे गाव ते जेजुरी अशा त्यांच्या पदयात्रेत गेलो होतो. तेव्हापासून माझ्यावरील त्यांच्या धडपडीचा प्रभाव सतत वाढतच गेला. थोर आदर्शवादी नेते पूज्य साने गुरुजी यांनी “धडपडणारी मुले’ हे पुस्तक लिहिले, मी जेव्हा ते वाचले त्यावेळी मला शरद पवारसाहेब साने गुरुजींच्या पुस्तकात सतत दिसत होते. प्रत्येकाने सतत कार्यमग्न राहावे हा साहेबांचा आदर्श घेऊनच मी वाटचाल करीत राहिलो. त्यांना अभिप्रेत असणारे उत्तम शिक्षण देण्यासाठी संस्था काढून बांधकाम व्यवसाय करीत राहिलो. आज जो काही मी आहे त्यामागे पवारसाहेबांचीच प्रेरणा आणि आदर्श आहेत.
बापदेव घाटाच्या पायथ्याशी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा 110 एकराचा परिसर उभारला आणि दहा हजार विद्यार्थ्यांना “केजी ते पीजी’ पर्यंत विविध शाखांचे शिक्षण सुरू करीत दहा हजार विद्यार्थ्यांनी परिसर भरून गेला. त्यावेळी पवारसाहेबांनी एकदा कॅम्पसला भेट द्यावी अशी तीव्र इच्छा बळावत गेली. 2011 मध्ये लोकसभेच्या निकालानंतर साहेबांना भेटायला दिल्लीला त्यांच्या 6 जनपथ निवासस्थानी गेलो.
पवार साहेबांनी “”आपण तो परिसर हेलिकॉप्टरमधून अनेकदा पाहिला पण तो कल्याण जाधव यांचा आहे याची कल्पना मला एकदा हेलिकॉप्टरच्या प्रवासात मिळाली होती.” असे स्पष्ट करून मी लवकरच भेट देणार असल्याचे सांगितले. चार वर्षांनी 2015 मध्ये हा योग जुळून आला आणि दिवसभर पवारसाहेब कॅम्पसमध्ये रमले. आर्किटेक्चर कॉलेजच्या नवीन वास्तूचे उद्घाटनही त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. हवेली आणि पुरंदर तालुक्यातून आलेले दहा हजारवर पालक आणि शुभचिंतक व तेवढेच विद्यार्थी असा भव्य कार्यक्रम पार पडला.
ऐन चाळीशीत महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झालेले शरद पवारसाहेब वयाच्या सव्विसाव्या वर्षी बारामतीतून आमदार झाले होते. तत्पूर्वी शाळेपासून आसपासच्या गावातून शेतीमाल, भाजीपाला आणि सायकलीवरून गुळाची ढेप घेऊन बाजारातून विकण्याचे काम करीत. त्यामुळे बाजारातील गावातून आणि दुकानदार विक्रेत्यांमध्ये त्यांचा संपर्क वाढलेला होता. त्याचा फायदा पहिल्या विधानसभा निवडणुकीत झाल्याचे ते आजही सांगतात. “कासा’ योजनेच्या गव्हातून दुष्काळी भागातून पाझर तलाव केले आणि पुढे मंत्री आणि पुढे चारवेळा मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षणमंत्री, दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री, मध्येच कॉंग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि स्वतःच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षनेते आणि स्वतःच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे 21 वर्षे अखिल भारतीय अध्यक्षपद हा त्यांचा राजकीय आलेख त्यांचे राष्ट्रीय नेतृत्व सिद्ध करीत राहिले. क्रिकेट, तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिशादर्शक काम उभे केले.
शरद पवारांच्या साठीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान वाजपेयींना या दोघांचे मित्र माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आणि मुंबई रेसकोर्सवर वाजपेयी आले आणि त्यांनी शरदरावांच्या कामाचे व दूरदृष्टीचे त्यांच्या जागतिक शैलीदार भाषणात कौतुक केले. वाजपेयी म्हणाले, “”कच्छ भूकंप झाला, त्यावेळी संसदेत 800 खासदार असताना एकमेव खासदार शरद पवार यांनी देशाच्या संकटकाळात पंतप्रधानांना मदत करण्यासाठी पुढे यावे याबद्दल मला मुळीच आश्चर्य वाटले नाही. त्यांच्या तरुणपणापासून मी त्यांना ओळखतो.
आम्ही अल्पकाळ एकत्र (पुलोद) काम केले, त्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्यासाठी मी कच्छ भूकंपाच्या पुनर्वसनाची जबाबदारी अतिशय विश्वासाने त्यांना दिली आणि ते विश्वासाला पात्र ठरले,” अशा शब्दांत जागतिक कीर्तीचे वक्ते आणि विद्वान व्यासंगी नेते अटलबिहारी वाजपेयींनी त्यांचे कौतुक केले.
शिक्षण क्षेत्रातील माझे आदर्श पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील (दादा) यांच्याबरोबर मी त्या ठिकाणी गेलो होतो. माझा ऊर भरून आला होता.
यशवंतरावांची विद्वत्ता, वसंतदादांचा मुत्सद्दीपणा, वसंतराव नाईकांचा दिलदारपणा आणि शंकरराव चव्हाण यांचा प्रशासकीय प्रामाणिकपणा याचे मिश्रण म्हणजे आपले पवार साहेब! साहेबांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांकडून सद्भावना व्यक्त कराव्यात असा माझा प्रयत्न असतो.
राजकीय मतभेद आणि पक्षीय विरोधक असूनही शिवसेना संस्थापक आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची घरगुती स्वरुपाची मैत्री आणि प्रेम टीका करीतही कशी वाढली आणि अखेरपर्यंत टिकली हे कोडे अनेकांना पडते.
दिल्लीच्या आणि राष्ट्रीय राजकारणात सर्वाधिक तीन दशके गाजविलेल्या पवारसाहेबांना पंतप्रधानपदाची संधी मोरारजीभाई देसाई यांच्याप्रमाणेच उशिराने वयाच्या 82-83 व्या वर्षीही मिळू शकते. अजूनही दहा वर्षे वयाच्या नव्वदीपर्यंत साहेब सक्रिय रहावेत. प्रकृती आजच्या -प्रमाणेच साथ देत राहावी आणि शरदचंद्राचे राजकीय चांदणे फुलवीत त्यांच्या प्रकाशात न्हाहावे अशी सदिच्छा!