अंकुश काकडे (प्रवक्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेस)
सत्ता असो नसो, कितीही संकटे, आपत्ती आली, तरी त्या सर्वांवर मात करणारी व्यक्ती म्हणजे शरद पवार. महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकीय पटलावर गेली 50 वर्षे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांसमोर आज ह्या घडीला एकच व्यक्ती दिसते ती म्हणजे साहेब.
12 डिसेंबर 1940 रोजी बारामती तालुक्यातील काटेवाडी या छोट्या खेड्यातील जन्म. घरातील वातावरण पुरोगामी विचाराचे, तसं पवार कुटुंब मोठं, लहानपणापासून आईचे विचार त्यांच्या मनावर खोलवर रुजलेले, ते किती महत्त्वाचे हे कांही दिवसांपूर्वी साहेबांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रावरून त्याची कल्पना येते. साहेबांच्या घरात तसं वातावरण शेतकरी कामगार पक्षाचं, पण साहेब मात्र कॉंग्रेस विचारसरणीचे तेही चव्हाण साहेबांच्या विचाराने भारावलेले, आजपर्यंतच्या राजकारणात चव्हाण साहेबांपासून काही काळ ते दूर गेले असतील पण साहेबांचा विचार त्यांनी कधीही सोडला नाही, त्याचे आपण साक्षीदार आहोत.
साहेबांकडे मी पहातो ते एक ऊर्जास्त्रोत म्हणून, त्यांची विद्यार्थी काळापासून सुरू झालेली राजकीय, सामाजिक वाटचाल आज वयाची 80 वर्षे पूर्ण होत असतांना देखील कुठेही खंड न पडता चालू आहे. या सर्व प्रवासात त्यांनी अनेक आव्हाने स्वीकारली आणि त्यांना यशस्वीपणे तोंडदेखील दिले मग ते राजकीय असो की, वैयक्तिक (स्वतःच्या गंभीर आजारावर यशस्वी मात केलेल्या साहेबांमुळे अनेकांना ऊर्जा मिळाली याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात.) महाराष्ट्राच्या राजकारणात चव्हाण साहेबांनंतर जे कांही मोजके सुसंस्कृत मुख्यमंत्री झालेत त्यात साहेबांचा क्रमांक 1 आहे हे निर्विवाद सत्य आहे.
आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले कांही दुर्दैवाने काळाच्या पडद्याआड गेले, कांही अजूनही आपल्यात आहेत, पण सर्वसामान्य जनतेपासून ते सर्वांच्या लक्षात राहणारे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर एकच ते म्हणजे साहेब, असं एकही क्षेत्र नाही की ज्यात साहेबांचा स्पर्श झाला नाही आणि तेही सातत्य टिकून आहे, सत्ता गेल्यानंतर तर अनेक जण काळाच्या विस्मृतीत गेलेले आपण पाहतो. साहेब मात्र याला अपवाद आहेत, सत्ता नसली तरी विरोधी पक्ष म्हणून देखील त्यांचे सातत्य आपणास पाहावयास मिळते.
2018-19 ह्या निवडणुकीत विरोधी पक्षात पराभव स्वीकारायला लागला, अनेक विरोधी पक्ष गलितगात्र झाले, पण साहेब मात्र डगमगले नाहीत, 2014 मध्ये राज्यातील सत्ता गेली. भा.ज.प. सरकारने अनेक नेत्यांच्या पाठीमागे कायदेशीर कारवाया सुरू केल्या, अनेकजण घाबरुन पक्ष सोडून गेले, ज्यांना साहेबांनी मोठे केले अशांनीही साहेबांची साथ सोडली, अनेक नेते चिंताग्रस्त झाले पण साहेब डगमगले नाहीत, त्यांनी जे बरोबर राहिलेने त्यांनी नवीन तरुण पिढीला बरोबर घेऊन सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रात लोकसभेला विरोधी पक्षाची धूळदाण झाली नंतर लगेच आलेली विधानसभा मित्र पक्षाकडे प्रभावी नेतृत्त्व नाही, साधनसामग्रीची कमतरता आहे, त्यांना बरोबर घेऊन निवडणुकीस सामोरे गेले, अगदी महाराजांचा देखील पराभव करून दाखवला भर पावसात केलेल्या भाषणामुळे निवडणुकीचं चित्रच पालटून गेलं, ह्या सर्व घटनांचे आपण साक्षीदार आहोत.
मला साहेबांचा आणखी एक वैशिष्ट्य लक्षात रहाते ते म्हणजे संकटमोचक म्हणून अगदी 1992 मध्ये लातूर-किल्लारीला झालेला महाभयंकर भूकंप असो की मुंबईत झालेले बॉम्बस्फोट असोत ह्या अशा कठीणप्रसंगी जागेवर जाऊन तेथे मदतकार्य सुरू करणे, तेथील लोकांमध्ये सरकार आपल्या पाठीमागे आहे ही भूमिका ते नेहमी पार पाडत आले आहेत.
कोकणात जांभुळपाडा येथे झालेला महापूर, सांगली, कोल्हापूर येथे झालेला महापूर, कांही महिन्यापूर्वी अतिवृष्टीमुळे मराठवाडा येथील शेतांची पाहणी अशी कितीतरी उदाहरणे लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात, महाराष्ट्र हा नेहमी दुष्काळाला सामोरा जात असतो, अशावेळी दुष्काळग्रस्त भागाचा पहाणी दौरा झाला नाही असे साहेबांच्या बाबतीत कधी घडले नाही. ह्या वर्षी करोनाने संपूर्ण विश्वाला धडकी भरली, अशावेळी काही काळ घरात थांबावं लागले पण अशाही वेळी फेसबुक, दूरध्वनी या माध्यमातून जनतेला धीर देण्याचे काम सातत्याने साहेब करत होते.
करोनाचं संकट हे मोठ्या प्रमाणावर वाढत असताना डॉक्टरांचा सल्ला धुडकावून साहेब घराबाहेर पडले, संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन तेथील आरोग्य यंत्रणांना सुचना त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम करणारे साहेब महाराष्ट्राने पाहिलेत, पुण्यात एका पत्रकाराचा ऍम्ब्युलन्स अभावी मृत्यू झाल्याची बातमी पहाताच पुणे, अहमदनगर येथे तातडीने ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात साहेब मागे राहिले नाहीत, ह्या करोना काळात अनेकांना करोनामुळे आपण मुकलो अशा अनेक कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करण्यात साहेबांनी डॉक्टरांचा सल्ला देखील जुमानला नाही, अशा साहेबांना परमेश्वर त्यांना शतायुषी करो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना!