सातारा – शाहूपुरी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. सलग तीन- तीन दिवस पाणी येत नाही, आले तर कमी दाबाने येते अशा तक्रारींचा पाढाच शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर वाचला. कण्हेर योजनेचे कनेक्शन शिफ्टिंगचे काम संथगतीने सुरु असून ही योजना तात्काळ सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शाहूपुरी व परिसरातील विस्कळित पाणीपुरवठ्याबाबत आघाडीचे भारत भोसले, राजेंद्र मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, सौ.शोभाताई केंडे, सौ. नीलमताई देशमुख, सौ. माधवीताई शेटे व नागरिकांनी मंगळवारी प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी चौगुले यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. शाहूपुरी परिसरात गेले अनेक दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून ऐन उन्हाळ्यात पाण्याचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीला नवीन कण्हेर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कनेक्शन शिफ्टिंगच्या कामादरम्यान प्राधिकरण अधिकारी, कर्मचारी व या योजनेसाठी काम करणाऱ्या व्यवस्थापनात असणारा समन्वयाचा अभाव कारणीभूत आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत दोन्ही बाजूने घेण्यात येत असलेल्या निर्णयात ताळमेळ दिसून येत नाही. याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत असून ऐन उन्हाळ्यात प्राधिकरणाच्या दारात पाण्यासाठी भिक मागण्याची वेळ आल्याच्या संतप्त भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. विस्कळित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी होऊनही जबाबदार अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन परिस्थिती योग्य क्षमतेने हाताळणे गरजेचे होते. मात्र, कर्मचारी, व्हॉलमन हे मालक असल्याच्या थाटात वावरताना दिसत आहेत.
काही वेळेस साडेबारा लाख लिटरची टाकी रात्री भरलेली असतानाही या कर्मचाऱ्यांनी टाकीत पाणी पातळी कमी असल्याचे सांगून पाणी सोडले नाही. यामुळे काही भागातील नागरिकांना सलग दोन- तीन दिवस पाणी समस्येला सामोरे जावे लागले. यावेळी उपकार्यकारी अभियंता जंगम, कण्हेर पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार दीपक भिवरे, विकास देशमुख, सुरेश शेटे यांची उपस्थित होते.
प्राधिकरणाची आश्वासने
कनेक्शन शिफ्टिंगचे काम आठवड्यात पूर्ण होणार
प्लंबरची मनमानी रोखण्यासाठी एकच दर निश्चित
दि. 15 मे पर्यंत ग्राहकांना सकाळी तीन ते चार तास
पाणी पुरवठा
पाणी सोडण्याचे वेळापत्रक ठरवून त्यानुसारच कर्मचारी काम करणार
समन्वय ठेवून काम करण्याचा प्राधिकरणाचा निर्णय
अरेरावी करणाऱ्या काही हंगामी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय