माणसाला कायम सोबत करणारी अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे सावली. दिवस असू दे नाही तर रात्र ही सावली काही माणसाला सोडून त्याच्यापासून कधीही दूर जात नाही. ती त्याच्या सोबतच असते. पण ती आहे हे कळते ते मात्र प्रकाशाच्या आधाराने. पृथ्वीतलावर वावरणारा माणूस हा एक बुद्धिजीवी प्राणी. त्याने आपल्या बुद्धीचा वापर करून या सावलीचा उपयोग कालमानासाठी केला. तीच सावलीचं घड्याळ या मागची संकल्पना.
आता आपण किती वाजले हे पाहायला चटकन हातावरचं घड्याळ किंवा खिशातला मोबाइल काढतो आणि वेळ पाहतो. पण पूर्वी काही या सोयी नव्हत्या. पण म्हणून काही माणसाला काळ, वेळ समजत नव्हती असं नाही. तर त्यांचं अनुमान लावण्याची साधने, पद्धती वेगळी होती इतकंच.
ग्रामीण जीवनातलं चालतं बोलतं घड्याळ म्हणजे कोंबडा. कोंबड्याची पहिली बांग कानावर पडली की ओळखावं आता सूर्योदय होणार, दिवस सुरू होणार. त्या प्राण्याला निसर्गानेच अशी काही शक्ती दिलीय की तो ठराविक वेळी बांग देतो आणि कालमानाचा अंदाजही.
सकाळी सूर्याचा उदय झाला आणि मनुष्य पूर्वेकडे तोंड करून त्यास वंदन करू लागला की माणसाची सावली ही त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे पश्चिमेला आणि सूर्य अस्ताला निघाला की तीच सावली त्याच्या पूर्वेला पडू लागते.
आणखी एक गंमत माणसाला अनुभवायला मिळते ती म्हणजे जेव्हा सूर्य हा अगदी माथ्यावर येतो. तेव्हा माणसाची सावली त्याच्याच पायात पडते. या सावलीवरून माणसाने घड्याळाची कल्पना करून कालमापनाच्या विविध पद्धती शोधल्या. जमिनीवर गोल काढून त्याच्या मध्यभागी एक काठी रोवायची आणि त्या काठीच्या सावलीवरून वेळ निश्चित करण्याची कल्पना ही बुद्धिजीवी माणसाचीच. इथे आणखी एका गोष्टीची आठवण झाल्याशिवाय राहात नाही, ती म्हणजे जंतरमंतर येथील सावलीचे घड्याळ.
आजही तुम्ही तिथे जाऊन पाहाल तर त्या अद्भुत घड्याळाची अशी काही रचना केलेली आहे, की सूर्याची किरणे आणि सावलीचे मोजमाप हे तुम्हाला तुमच्या हातातील घड्याळातली वेळ तिथे सावलीच्या गणितावरून अचूक दाखविते. त्यात जरासुद्धा फरक पडत नाही. हे आश्चर्य आणि चमत्कार आहे त्या निसर्गाचा आणि निसर्गदत्त मानवी बुद्धिमत्तेचा.