संयुक्त राष्ट्रे – अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 20 वर्षांच्या कालावधीनंतर आता पुन्हा वेगवेगळ्या व्याख्येनुसार दहशतवादाच्या संबंधात पुन्हा भेदभाव सुरू करण्याचा प्रकार केला जाऊ नये.
तुमचा दहशतवादी आणि आमचा दहशतवादी अशा स्वरूपाच्या भेदभावाकडे आपण पुन्हा वळता कामा नये तर सामूहिकपणे आपण या दहशतवादाचा मुकाबला केला पाहिजे, असे प्रतिपादन भारताच्या संयुक्त राष्ट्रांतील प्रतिनिधींनी आज संयुक्त राष्ट्रांमध्ये दहशतवादाच्या संबंधातील एका प्रस्तावावर चर्चा करताना केले.
जागतिक दहशतवादाच्या विरोधातील भूमिकेचा सातवा आढावा सध्या संयुक्त राष्ट्रांत घेतला जात आहे. त्यावर आम सभेत चर्चा सुरू आहे. त्यात बोलताना भारताचे तेथील प्रतिनिधी टी. एस. तिरूमूर्ती यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, दहशतवादाचे आव्हान वैश्विक स्वरूपाचे आहे आणि त्याचा जगातील सर्वच देशांनी एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाने या आधीच केले आहे.
9/11 च्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर जगाने पहिल्यांदाच मान्य केले की, जगाच्या एका कोपऱ्यातील दहशतवादाचा दुसऱ्या कोपऱ्यातील देशांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या विरोधात सगळ्यांनीच सामूहिकपणे त्याचा मुकाबला केला पाहिजे.
9/11 च्या घटनेपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी आमचा दहशतवादी आणि तुमचा दहशतवादी असे शब्दप्रयोग आपण वापरत होतो. पण गेल्या 20 वर्षांत मात्र ही स्थिती मागे पडली असून आपण सगळेच दहशतवादाच्या विरोधात एकत्र आलो आहोत. दहशतवादाची जगाला मान्य होणारी व्याख्या तयार करण्यात आपल्याला अजून यश आलेले नाही.
हिंसक राष्ट्रवाद, उजव्या विचारसरणीचा दहशतवाद अशा स्वरूपाची फारकत करून आता पुन्हा दहशतवादाच्या बाबत भेदभावाची चर्चा सुरू केली जात आहे हे योग्य नाही, असेही भारताने म्हटले आहे.