राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार
पुणे – पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना येत्या 2019 -20 आंबिया बहारामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेत एकूण सात फळांना विमा कवच मिळणार आहे. राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2011-12 ते 2015-16 पर्यंत राबविण्यात येत होती. त्यानंतर 2016-17 पासून या योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. सन 2016 च्या मृग बहारापासून समूह (क्लस्टर) पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यामध्ये मृग बहारासाठी 5 व आंबिया बहारासाठी 4 समूह (क्लस्टर) तयार केलेले आहेत. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, गारपीट व वेगाचे वारे या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांचे विमा संरक्षणाद्वारे आर्थिक स्थैर्य आबाधित राखणे हा या योजेचा मुख्य उद्देश आहे.
आंबिया बहारामध्ये द्राक्ष, डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा व काजू या सात फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत सोलापूर, अहमदनगर, जालना, पुणे, पालघर, सातारा, नांदेड, नागपूर, यवतमाळ, सांगली, औरंगाबाद, धुळे, अमरावती, अकोला, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगांव, बुलढाणा, लातूर, रायगड, उस्मानाबाद, रत्नागिरी, परभणी, बीड, ठाणे, नाशिक, वर्धा, वाशिम, हिंगोली या 30 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
हप्ता भरण्याची मुदत 21 जानेवारीपर्यंत
या जिल्ह्यांतील फळपिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जे शेतकरी विविध वित्तीय संस्थेकडून पीक कर्ज घेतात तसेच ज्या अधिसूचित फळपिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची आहे. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जदार शेतकरी व इतर निकषांनुसार 7 नोव्हेंबर 2019 ते 21 जानेवारी 2020 या कालावधीत हप्ता भरण्याची मुदत देण्यात आली आहे.