Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून रुजतील राजकारण हे वेगळ्याच वळणावर गेले आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी होत असताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी या मागणीला विरोध केला आहे. मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर केलेले आरोप भुजबळांनी विधानसभेत मांडत गंभीर आरोपही केला. भुजबळांनी आरोप करताना, “एक दिवस मी सकाळी उठलो आणि पाहिलं की माझी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा का वाढवली याची चौकशी केली तेव्हा पोलिसांनी सांगितलं की, त्यांना वरून इनपूट आले आहेत की मला गोळी मारली जाईल.” दरम्यान, पोलिसांचा अहवालही भुजबळ यांनी सभागृहात मांडला.
छगन भुजबळांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले, भुजबळांना कोणीही काहीही करणार नाही. परंतु, भुजबळ काहीही बोलत आहेत आणि सरकार त्यांची बाजू घेऊन मराठ्यांवर अन्याय करू लागलं आहे असं चित्र दिसतंय. अशीच प्रत्येक मराठ्याची भावना आहे. सरकार त्यांची एकट्याची बाजू घेत आहे आणि मराठ्यांवर अन्याय करत आहे. मी खूप जबाबदारीने शब्द वापरतोय. सध्या सरकार भुजबळांच्या दबावाखाली आहे,” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी, आपलं राज्य सरकार भुजबळांच्या दबावात येतंय. तेदेखील हा दबाव निर्माण करत आहेत. कारण, त्यांना त्यांच्यावरील खटले रद्द करून घ्यायचे आहेत. भुजबळ मराठ्यांवर खोटे आरोप करून, सरकारची फसवणूक करून मराठ्यांवर अन्याय करू लागले आहेत. गावखेड्यात सरकारविषयी रोष पसरू लागला आहे. कारण सरकार भुजबळांची बाजू घेऊन मराठ्यांवर अन्याय करतंय. परंतु, आम्ही शांत बसणार नाही. सरकारने भुजबळांना उगाच बळ दिलं तर आम्ही आंदोलनाद्वारे सरकारला उत्तर देऊ.” असा इशारा त्यांनी यावेळी केला.
तसेच जरांगे पाटील यांनी, सारथीप्रमाणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे ओबीसींनाही सवलती द्या, निधी द्या आणि जातींमध्ये समानता आणा, असे भुजबळ काल विधानसभेत म्हणाले. म्हणजे यांच्याकडे आरक्षण आहेच, यासह ते आमच्यासाठी असलेल्या ‘सारथी’लाही विरोध करणार, म्हणजे किती खालच्या दर्जाचा माणूस आहेत असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा राज सरकारवर निशाणा साधला.