पुणे – ज्येष्ठ गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी आज पुण्यातील राहत्या घरी सकाळी निधन झाले. त्या जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होत्या. मात्र त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मंगला नारळीकर यांचा जीवनप्रवास –
मुंबई विद्यापीठतून १९६२ साली मंगला नारळीकर यांनी बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली गणितमध्ये एम.ए. झाल्या, या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. तेव्हा तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले होते. १९६५ मध्ये त्यांचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी झाला. संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होते. त्यांना गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुली आहेत.
मंगला नारळीकर यांनी १९६४ ते १९६६ या काळात इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून काम केले. १९६७ ते १९६९ मध्ये केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत त्यांनी गणिताचे अध्यापन केले. आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.