मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून यावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारची हुकूमशाही वृत्ती दिसून आली असून त्यांना निवडणुकांतील पराभवाचीच अधिक भीती असल्याचे त्यातून दिसून आले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयामागील कारणे स्पष्ट करण्याची मागणी सरकारकडे केली.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री डरपोक आहेत. ते पुणे लोकसभा पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाहीत. निदान मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका तरी होतील असे आम्हाला वाटत होते. सिनेट मधील पराभवाने तुमचे सरकार पाडणार नाही, मग तुम्ही सिनेटला का घाबरता? असा सवाल त्यांनी केला. 2010 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने 10 जागा लढवल्या होत्या, तेव्हा त्यांनी आठ जिंकल्या होत्या आणि 2017 मध्ये सर्व 10 जागा जिंकल्या होत्या.
विद्यापीठाचे हे पाऊल लोकशाहीला मारक असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, 10 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार होत्या आणि त्या का रखडल्या याचे कोणतेही कारण देण्यात आले नाही. मुंबई विद्यापीठाने गुरुवारी सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला. सिनेट हा संस्थेचा वॉचडॉग आहे, ज्यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाचे प्रतिनिधी असतात. जोपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत कुलगुरूंचा घेराव केला जाईल, असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अमोल माटेले यांनी सांगितले.