कोलकाता – श्रीलंकेविरुद्ध उद्या (गुरूवार) येथे होत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासह यजमान भारतीय संघ ही मालिकाही जिंकण्यासाठी सज्ज आहे. पहिला सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही वर्चस्व राखले आहे. या मालिकेत भारतीय फलंदाजी श्रलंकेपेक्षाही जास्त बलाढ्य असल्याचे दिसन आले आहे.
भारतीय संघाचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल भरात असून विराट कोहलीने पहिल्या सामन्यातील शतकाने आपणही सुरात आल्याचे दाखवून दिले आहे. आता श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या व लोकेश राहुल यांना आता आपली कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे. पहिल्या सामन्यातून इशान किशन व सूर्यकुमार यादव यांना खेळवले गेले नव्हते त्यामुले ते आजच्या लढतीत खेळतील का संघ व्यवस्थापन पहिल्या सामन्यातील विजेता संघच कायम राखतील हेच पाहणे गरजेचे आहे.
गोलंदाजीत मात्र, भारतीय संघाला जास्त जबाबदारीने कामगिरी करावी लागणार आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने निवडला गेल्यावरही या मालिकेतून माघार घेतल्याने पुन्हा एकदा महंमद शमी, महंमद सिराज यांच्यासह उमरान मलिकलाही हा भार वाहावा लागणार आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंग व कुलदीप यादव यांना संधी मिळणार का हाच मोठा प्रश्न आहे. यजुवेंद्र चहलच्या जागी वॉशिंग्टन सुंदर हा चांगला पर्याय ठरु शकेल. या संघातील खेळाडूंना रोटेशननूसार खेळवले गेले तरच आगामी काळात होत असलेल्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाकडे जास्तीत जास्त पर्याय राहणार आहेत.
दुसरीकडे श्रीलंका संघाला केवळ कर्णधार दासुन शनाकानेच तारले आहे. मात्र, प्रत्येक सामन्यात त्याच्यावरच मदार ठेवण्यापेक्षा अन्य खेळाडूंनाही सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे अन्यथा हा सामना गमावला तर ते मालिकाही गमावणार आहेत. कुशेल मेंडीस, पाथुम निसांका, चरिथा असालंका व चामिका करुणारत्ने यांच्या कामगिरीवरच त्यांच्या यशापयशाचे चित्र रंगणार आहे. गोलंदाजीतही त्यांना प्रमुख गोलंदाज नसल्याने कासुन रजितासह अनुभवी वनिंदू हसरंगा यांच्याकडूनच सरस कामगिरीची अपेक्षा राहणार आहे.
उमरानकडून जास्त अपेक्षा
देशाचा सर्वात भेदक नवोदित गोलंदाज उमरान मलिक याने चमक दाखवली आहे परंतू आता त्याला त्याचे संघातील स्थान निश्चित करण्यासाठी आणखी जास्त क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. केवळ वेग महत्वाचा नसून दीशा व टप्पाही तीतकाच महत्वाचा असतो त्यामुळे त्याच्या खात्यावर जास्त बळींची नोंद होणे गरजेचे आहे.