रायगड – इर्शाळवाडीमध्ये शनिवारी तिसऱ्या दिवशीही शोध आणि बचाव मोहीम सुरूच आहे. शनिवारच्या ताज्या आकडेवारीनुसार भूस्खलनातील दुर्घटनेतील मृतांची संख्या 26 वर पोहोचली आहे, तर 82 गावकऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही आणि त्यांच्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. बुधवारी रात्री येथे दरड कोसळल्याची घटना घडली होती.
एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू –
शनिवारी ढिगाऱ्यातून आणखी चार मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर भूस्खलनामुळे मृतांची संख्या 26 झाली आहे. दिवसभरात तीन महिला आणि एका पुरुषाचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) अधिकाऱ्याने दिली.
आतापर्यंतच्या मृतांमध्ये 10 पुरुष, 12 महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी सकाळपासून तिसऱ्या दिवशी एनडीआरएफ आणि इतर सरकारी यंत्रणांकडून शोध आणि बचाव कार्य आहे.
एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुसळधार पावसामुळे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता शोध मोहीम मागे घेण्यात आली. ते म्हणाले, एनडीआरएफ आणि इतर एजन्सीच्या चार पथकांनी शनिवारी सकाळी पुन्हा ऑपरेशन सुरू केले. डोंगराच्या उतारावर असलेल्या गावातील 48 पैकी किमान 17 घरे भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे किंवा अंशत: गाडली गेली.
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, गावातील 229 रहिवाशांपैकी 26 मरण पावले आहेत, 10 जखमी आहेत आणि 111 सुरक्षित आहेत, तर 82 लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही आणि शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. मात्र, यातील काही जण लग्नासाठी गावाबाहेर गेले होते, तर काही भात लावणीच्या कामासाठी बाहेर होते, असे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी ज्या सहा बळींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यापैकी तीन पुरुष आणि तीन महिला होत्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की मृतांमध्ये सहा महिने ते चार वर्षे वयोगटातील चार मुलांचा समावेश आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील नऊ सदस्यांमध्ये तीन वर्षांचा मुलगा आणि त्याची सहा महिन्यांची बहीण यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत तीन जनावरांचाही मृत्यू झाला आहे, तर 21 जनावरांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव कार्य अजूनही सुरु आहे.