अक्षता आणि टाळ्यांचा कडकडाट श्रीनाथ म्हस्कोबा पालखीला दिला निरोप
सासवड/वाघापूर – सवाई सर्जाचं चांगभलंचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, पालखी सोहळ्यावर होणारी पुष्पवृष्टी आणि हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीचे 11 दिवसांच्या यात्रेसाठी श्रीक्षेत्र वीरकडे प्रस्थान झाले. यावेळी उपस्थित भाविकांची अक्षता आणि टाळ्यांचा कडकडाट करीत सोहळ्यास निरोप दिला.
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरंदर तालुक्यातील क्षेत्र वीर येथील येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. श्रीक्षेत्र कोडीत येथून देवाचे भक्त तुळाजी महाराज यांच्या मंदिरापासून दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील विवाह सोहळ्यासाठी माघ पौर्णिमा शनिवारी (दि. 8) शाही सोहळा दिमाखात प्रस्थान झाले. यावेळी ढोल-ताशांचा अखंड गजर, मोठ्या प्रमाणात पुष्पृष्टी आणि हजारो भाविकांची उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
दरम्यान, श्रीक्षेत्र कोडीत येथे शुक्रवारी पहाटे उत्सव मूर्तीना अभिषेक घालण्यात आला. ढोल-ताशांच्या व पारंपरिक वाद्याच्या गजरात मानाच्या काठीसह छत्री, अब्दागिरी, चवऱ्या ढाळत देउळवाड्यातून जवळ असणाऱ्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे परम भक्त असलेल्या तुळाजी मंदिरात पालखी विसावली. पालखीसह सर्व लवाजमा विसावल्यावर उपस्थित श्रीनाथभक्तांनी “सवाई सर्ज्याचं चांगभल’ चा जयघोष केला. यामुळे संपुर्ण श्रीक्षेत्र कोडीतनगरी दुमदुमून गेली होती. दरम्यान, तुळाजीबुवा मंदिरात पारंपरिक ओव्यांचा व एकतारी भजनाचा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान, पहाटे 5 वाजता उत्सव मूर्तीना महारुद्र अभिषेक घालुन उत्सव मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी उत्सव मूर्तींचे दर्शन घेतले. दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेऊन हजारो भाविक पायी अनवाणी वीरकडे पारंपरिक वाटेने चालत निघाले. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर सर्वांची लगबग सुरु झाली. पालखी जवळ मानकरी सालकरी अब्दागिरी छत्र निशाण घेऊन मानकरी उभे होते. 12.30 वाजता तुतारी वाजली व मानकऱ्यांनी श्रीनाथ म्हसोबा महाराजांच्या पालखीला खांदा लावला.
ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्याचा गजर सालकरी, मानकरी व हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीनाथांच्या पालखीचे श्रीक्षेत्र वीरकडे शाही प्रस्थान सुरु झाले. या पालखी पुढे मानाची काठी पालखी समवेत दागदागीनदार अब्दागिरी चवऱ्या ढाळत हजारो भाविकांच्या उपस्थित अक्षता झेलीत धिम्यागतीने पालखीने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. पालखी नदी पलीकडे गेल्यावर नागदरी या ठिकाणी पारंपरिक मेंढ्याचे रिंगण वाद्याच्या गजरात पार पडले. पिंपळे ते वीर अशा पालखीमार्गावर पुणे येथील जयश्री आर्टच्या कलावंतांनी सुबक रांगोळ्या काढल्या.
वीर देवस्थानच्या वतीने जल्लोषात स्वागत
श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची पालखी भिवडी, सुपे, पिंपळे, पांगारे घाटमार्गे परिंचे गावारून पालखी राउतवाडी येथे विसावली. सायंकाळी सात वाजता पालखी वीर येथे पोहोचल्यानंतर वीर देवस्थानच्या वतीने पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पहाटे दोन वाजता विवाह सोहळा रंगला
मध्यरात्री 12 वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाहसोहळा निमित्त सर्व देव देवतांना प्रथम आवाहन करण्यात आले. त्यानंतर मानाच्या सर्व काठ्या आणि पालख्या यांची चिंचेच्या ओढ्यात भेटी झाल्या. त्यानंतर सर्व काठ्या आणि पालख्याचे मंदिरात आगमन झाल्यानंतर प्रदक्षिणा झाली. त्यानंतर पहाटे 2 वाजता मोठ्या उत्साहात विवाह सोहळा पार पडला. आणि सुमारे 11 दिवसांच्या सोहळ्यास सुरुवात झाली.