भगवंत लोहार
मल्हारपेठ -शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना स्वस्त दरात धान्याचे वितरण करण्यात येते. धान्य वितरणात पारदर्शकता यावी आणि लाभधारकाला त्याचा लाभ मिळावा यासाठी आधारकार्ड बेस्ड पॉश मशिनवरील वितरण प्रणाली अमलात आणली आहे. मात्र दर महिन्याला अनेक ग्राहक धान्याची गरज नसल्यासारखे वागत असून दुकानदारांनाच ग्राहकांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. दरम्यान वाटपाची टक्केवारी कमी होत असल्याने कारवाईची टांगती तलवार घेऊन दुकानदार ग्राहकांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत.
स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने वाटले जात होते. त्यावेळी काही प्रमाणात धान्य शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नव्हते. त्याबद्दल तक्रारीही होत्या. धान्य वितरणात पारदर्शकता येऊन प्रत्येक लाभार्थ्यांचे धान्य त्यालाच मिळावे, त्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी आधार कार्ड प्रणालीवर आधारित पॉश मशीनावरून ऑनलाइन धान्य वाटपाची प्रणाली अमलात आली. त्यामुळे ग्राहकाचा बोटाचा ठसा घेतल्याशिवाय धान्य वाटता येत नाही .
त्यामुळे जर ग्राहक आला नाही तर त्याच्या धान्याचे वाटप करता येत नाही. यापूर्वी रेशनकार्ड घेऊन कोणीही कोणाचे धान्य घेऊन जाऊ शकत असे, त्यामुळे गावाकडे रेशनकार्ड असणारे बाहेरगावी राहत असले तरी त्यांचे धान्य ज्याच्याकडे कार्ड आहे तो घेऊ शकत होता. त्यासाठी ऑफलाइन पद्धतीने रजिस्टर व पावती पुस्तकाला नोंद केली जात होती. मात्र याचे दुष्परिणाम ही होते. अनेक दुकानदार गावाकडील धान्य दुकान दोन चार दिवस चालू ठेवत असत आणि धान्य संपले असे ,
सांगून रजिस्टरवरील नोंदी पूर्ण करून धान्याचा काळाबाजार करत. त्यामुळे अनेक ग्राहक धान्याच्या लाभापासून वंचित राहायचे. तर बरेच जण आपले रेशनकार्ड दुसऱ्याला देऊन प्रत्यक्ष लाभ घेत नव्हते तर अनेकांनी बोगस रेशनकार्ड काढुन बोगस लाभार्थीं शासनाची फसवणूक करीत होते. दुकानदार आणि बोगस ग्राहक पळवाटा शोधून बोगसगिरी करीत होते.
यावरील उत्तम पर्याय म्हणून पॉश मशिनवरील धान्य वाटप प्रणाली यशस्वी ठरली आहे. ग्राहकाच्या बोटांचे पॉश मशीनवर स्कॅनिंग झाल्याशिवाय धान्य वाटप होत नाही. त्याचप्रमाणे पॉश मशीनवर वाटपाची टक्केवारी जेवढी जास्त , त्या प्रमाणात दुकानदारांना रिबेट मिळत आहे. त्यामुळे धान्य जास्त प्रमाणात वाटप होणे आवश्यक असते. तर वाटप कमी झाले तर वरिष्ठांकडून विचारणा होते. कमी वाटप झाल्यास कारवाईची टांगती तलवार असते. हे सर्व पाहता धान्य नेण्यासाठी दुकानदार ग्राहकांचे उंबरठे झिजवत आहेत.
वास्तविक अनेक अपात्र लाभार्थी धान्याचा लाभ घेत असून त्यातील अनेकजण गरज नसल्यासारखे करत आहेत. हेच लाभार्थी दर महिन्याला दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत . अशा ग्राहकांना लाभ नाही मिळाला तरी त्यांना काही वाटत नाही. तसेच अनेक रेशनकार्ड एक दोन व्यक्तींची असून बोटाचे ठसे न उठण्यामुळे त्यांना धान्य वाटता येत नाही.