चाफळ -पाटण तालूक्यातील चाफळ विभागात एकूण आठ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचे बिगूल वाजले असून आठपैकी वागजाईवाडी व विरेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूका अंत्यत चुरसीच्या व अटातटीच्या होणार आहेत. दोन्ही गटाकडून मोर्चे बांधणीस सूरूवात झाली आहे. नेहमी प्रमाणे ही निवडणूक दुरंगीच होणार असून देसाई व पाटणकर या दोन पारंपारिक राजकीय गटामध्ये कडवी झुंज या निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळणार आहे.
सरपंचपदाचे आरक्षण निवडणूकीनंतर जाहीर होणार असल्याने गावपूढारयांची चांगलीच गोची झाली आहे. आठ पैकी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीवर देसाई गटाचा सरपंच की पाटणकर गटाचा सरपंच हे माञ गूलदस्त्यातच आहे. खोनोलीत माञ दोन्ही गटाचा समझोता झाला असताना दोन अपक्ष अर्ज राहील्याने या ठिकाणी अपक्ष विरोधात दोन्ही गट अशी लढत होणार आहे. बाकी पाच ग्रामपंचायतीत देसाई व पाटणकर गटात सरळ लढत होणार आहे. त्यामूळे दोन्ही गट आपली सत्ता अबाधीत राखत विरोधी गटांकडून सत्ता पालटवण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामूळे ऐन थंडीच्या कडाक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
चाफळ विभागातील चव्हाणवाडी, केळोली, शिंगणवाडी, खोनोली, पाठवडे, वाघजाईवाडी, विरेवाडी, कोचरेवाडी या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीचा बिगूल वाजला आहे. यातील चव्हाणवाडी, केळोली, शिंगणवाडी, खोनोली व पाठवडे या ग्रामपंचायती देसाई गटाकडे आहेत. तर वाघजाईवाडी, विरेवाडी व कोचरेवाडी या ग्रामपंचायतीत पाटणकर गटाची सत्ता आहे. विभागातील या आठही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना वागजाईवाडी व विरेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. शिंगणवाडी येथे एक उमेदवार बिनविरोध झाला आहे. खोनोलीत तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर तेथे दोन जागासांठी निवडणूक होत आहे.
विभागात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीत पाटणकर गटाकडून देसाई गटावर 1700 मताचे लिड होते.ते लिड विधानसभा निवडणूकीत कमी करून देसाई गटाने 35 मताचे लिड घेतले होते. त्यामूळे मागील निवडणूकीचा विचार करता दोन्ही गट विभागात समसमान झाले आहेत.त्यामूळे प्रत्येक ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार मोर्चेबांधणीला वेग आला आहे.