कोरेगाव – धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वाई, जावली, सातारा व कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी हजेरी लावत धोम धरणाची जलपरिक्रमा करत जलाशयाचे पूजन केले. यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणामध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाण्याचा साठा आहे. सर्व नेतेमंडळी लाभक्षेत्रातील पाणी नेवू इच्छित आहेत, त्याला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आंदोलनासाठी सज्ज रहावे, असे आवाहन धोम पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे करण्यात आले.
यावेळी समितीच्या वतीने धोम धरण परिक्रमा व जलाशयाची पूजन शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले यावेळी शेतकऱ्यांनी प्रखरपणे आपली मते मांडली. जिल्ह्यातील प्रत्येक नेत्याचा धोमच्या धरणातील पाण्यावर डोळा आहे आणि म्हणूनच आपण आपल्या धोम धरणाच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी संघटीत व्हावे लागेल व वेळप्रसंगी आंदोलनासाठी सज्ज रहावे लागेल, असे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांनी धोमचे असो अथवा कोणत्याही धरणाचे पाणी हे कालवा पाणी वापर संस्था स्थापन करून वापरावे, असे आवाहन केले. धोम धरण यंदा भरले नसल्याने सर्वांनी जागरूक राहून संघटीतपणे आपल्या पाण्यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे यांनी सांगितले.
मी धोम धरण प्रकल्पग्रस्त तथा भूमीपूत्र आहे. धरणातून आमची 42 गावे उध्वस्त झाली. मात्र त्यामधून 4 हजार 200 च्या वर गावांना पाणी मिळाल्याचा आम्हाला मोठा आनंद आहे. शासनाने आमचे पुनर्वसनही चांगले केल्याचे राजेंद्र शेलार यांनी सांगितले. धोम धरणावर जेव्हा बलकवडी काढले तेव्हा आपल्या पाण्याचा कोटा कमी झाला. बलकवडीचा बोगदा 10 टीएमसीच्यावर घ्यायला हवा होता तो 3.5 टीएमसीच्या खाली घेतल्यामुळे तिकडे पाणी जास्त जाते, असे समितीचे सचिव नंदकुमार पाटील यांनी नमूद केले.
कॅ. महादेव भोसले म्हणाले, संघर्ष समिती आपली बाजू मांडताना आमदार, खासदारांनाही भीत नाही. आपली बाजू सक्षमपणे मांडताना कमी पडत नाहीत ही संघर्ष समितीने जमेची बाजू आहे. माणिकराव भोसले, अर्जुन भोसले, किशोर राऊत, नेताजी भोसले, पृथ्वीराज बर्गे, ऍड. रोहिदास बर्गे, ऍड. श्रीकांत चव्हाण, जगदीश पवार, उदयसिंह बर्गे आदींनी मनोगते व्यक्त केली.