सातारा – नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने खरीप हंगामासाठी पंतप्रधान फसल बीमा योजना पुढे सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे. या खरीप हंगामामध्ये या योजनेत आजअखेर जिल्ह्यातील सुमारे 91 हजार 500 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून योजना सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी अजूनही या योजनेत सहभागी झाले नसल्याने त्यांनी दि. 31 जुलैपूर्वी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे. तालुकानिहाय महसूल मंडलनिहाय पिके व क्षेत्र अधिसूचित केली असून त्याप्रमाणे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या नऊ पिकांसाठी जिल्ह्यामध्ये ही योजना लागू असून या या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया विमा हप्ता रक्कम भरावयाची आहे.
उर्वरीत विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे. या योजनेंतर्गत संरक्षित रकमेची सांगड पिकाच्या आधारभूत किंमतीशी घातल्याने संरक्षित रकमेत वाढ झाली आहे. परंतु, विमा हप्ता दर 2 टक्के असूनही शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरुन योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत खाते आहे त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरावयाचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रामार्फत पोस्ट कार्यालय व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरुनही विमा हप्ता भरण्याची व्यवस्था करण्यात आली आह, असे त्यांनी सांगितले.
या योजनेतर्गत गारपीट, भूसख्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, ढगफुटी, चक्रीवादळ अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर निश्चित करण्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी वित्तीय संस्थेस (बॅंकेस) अथवा विमा कंपनीस नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी गाव पातळीवरील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.