सातारा – सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. सर्वच पक्ष राजकीय बांधणीच्या तयारीत असताना सातारा जिल्ह्यात ठाकरे गटही सक्रिय झाला असून “होऊ द्या चर्चा’ या अभिनव उपक्रमाद्वारे जनसंवाद आणि प्रचार असा दुहेरी उपक्रम राबवत शिवसेना कार्यकर्ता नागरिकांपर्यंत पोहोचू लागला आहे.
सातारा शहरामध्ये शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, संघटक प्रणव सावंत तर तालुका पातळीवर जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांची बांधणी सुरू आहे. शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाल्याच्या घटनेला आता सव्वा वर्ष झाले असून, दोन्ही गट एकमेकांवर शिरजोर होण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या बिनीच्या शिलेदारांना बोलावून पश्चिम महाराष्ट्र विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये पाळेमुळे घट्ट करण्याच्या दृष्टीने सुचित केले आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने कार्यकारिणीचा नुकताच विस्तार केला असून त्यामध्ये सातारा जिल्ह्यात विशेष संपर्क अभियान राबवण्याचा आदेश आहे. “होऊ द्या चर्चा’ हे असेच एक अभियान असून या अभियानामध्ये पक्षाची ध्येय धोरणे आणि अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे.
सातारा शहरामध्ये शहर कार्यकारिणी विस्तारली असून शहर संघटक प्रणव सावंत, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, युवा सेना शहर प्रमुख शिवेंद्र ताटे, उपशहर प्रमुख शिवाजीराव इंगवले, गणेश अहिवळे, अमोल गोसावी, सादीक बागवान, अनिल गुजर, शिवसेना महिला संघटिका मंजिरी सावंत, छायाताई शिंदे यांनी शहरात फिरून विशेषतः मोती चौक, मारवाडी चौक, देवी चौक, कमानी हौद, नगरपालिका, सायली हॉटेल, पोवई नाका, सातारा एसटी स्टॅंड येथे जाऊन शिवसेनेच्या कामाचा लेखाजोखा नागरिकांपुढे मांडण्यास सुरुवात केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या शिवभोजन थाळीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता या दृष्टीने ही पुनर्बांधणी केली जात आहे. संपर्क मंत्री नितीन बानुगडे पाटील यांच्या माध्यमातून ही बांधणी सुरू आहे. सचिन मोहिते यांनी काही दिवसांपूर्वी सातारा शहरात बोकाळलेल्या फायनान्स कंपन्यांच्या विरोधात आंदोलनाचे शस्त्र उभारले होते. उद्धव ठाकरे यांनी ठरवून दिलेल्या अजेंड्याप्रमाणे फलटण, माण, खटाव, कराड उत्तर, दक्षिण आणि सातारा या मतदारसंघात मजबूत बांधणी करण्यावर भर राहणार आहे.