पर्यावरण अभ्यासक रणधीर भोसले; कायम हिरवेगार असल्याने वृक्षांची होते लागवड
फलटण – सप्तपर्णी वृक्षांबाबत सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल केल्या जाणाऱ्या संदेशांमधून अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. फलटणमध्ये गैरसमजातूून सप्तपर्णीच्या फांद्या छाटण्यात आल्या. मात्र, सप्तपर्णी वृक्ष आरोग्यासाठी अपायकारक नसल्याचे मत निसर्ग रक्षण समितीचे अध्यक्ष रणधीर भोसले यांनी व्यक्त केले.
सप्तपर्णी वृक्षाची वाढ लवकर होते. हे वृक्ष नेहमी हिरवेगार रहात असून, कोणत्याही ऋतूत चांगली सावली देतात. त्यामुळे शहरे आणि गावांमध्ये अनेक घरांसमोर, शाळा, महाविद्यालय परिसरात, रस्त्यांच्या दुतर्फा आणि उद्यानांमध्ये सप्तपर्णीची लागवड केली जाते. सप्तपर्णी हा विदेशी वृक्ष वनस्पती असून, तो अत्यंत विषारी आहे. हे वृक्ष विषारी वायू उत्सर्जित करतात. तो श्वासातून शरीरात गेल्यास उलटी, मळमळ, डोकेदुखी होते. या वृक्षामुळे पचनसंस्थेचे आजार, वात, पित्त, श्वसनदाह, ऑक्सिजनची कमतरता, कफ, दमा, अल्सर व कॅन्सर सारखे गंभीर आजार होतात, असे गैरसमज आहेत; परंतु हे वृक्ष विदेशी नसून, ते भारतीय उपखंडातच आढळतात.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या वृक्षाला फुले येतात. या फुलांच्या थोडा वास येतो. ऍलर्जीचा त्रास असलेल्यांना या वासामुळे डोकेदुखी जाणवते. मात्र, कॅन्सर, अल्सर किंवा अन्य कोणतेही आजार या वृक्षामुळे होत नाहीत. विकीपीडियावरील माहितीनुसार सप्तपर्णीचा आयुर्वेद आणि युनानी या परंपरागत औषधी पद्धतीत वापर केला जातो. हगवण, जुलाब, मलेरियाचा ताप, फीट, अस्थमा, त्वचा विकार, सर्पदंश इत्यादी बरे करण्यासाठी खोडाच्या सालीचा उपयोग केला जातो. खोडाची साल कडवट, तुरट असते. ही साल मलेरियाच्या तापावरील उत्तम औषध आहे. सप्तपर्णीबाबत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
सप्तपर्णी हा पश्चिम बंगालचा राज्यवृक्ष आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात विद्यार्थ्यांना पदवीसोबत सप्तपर्णीची पाने दिली गेली होती. सप्तपर्णीचे शास्त्रीय नाव “अल्स्टोनिया स्कॉलरिस’ हे आहे. या खोडाच्या सालीपासून मलेरिया बरा होत असल्याने, या वृक्षास “इंडियन सिंकोना’ असेही म्हणतात. खोडातून येणारा पांढरा चिक अल्सर बरा करण्यासाठी वापरला जातो. पर्यावरण अभ्यासक बाळकृष्ण देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वृक्ष कायम हिरवेगार असल्याने, सध्या या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात फुले येण्याच्या काळात वास येतो. हा वास अनेकांना सहन होत नाही. त्यातच ऑक्टोबर हा पावसाळा संपून, हिवाळा सुरू होण्याचा काळ आहे. या हवामान बदलाच्या वेळी अनेकांना फ्ल्यू, ताप, सर्दी, खोकला असे त्रास होतात. मात्र, याच वृक्षांच्या वासामुळे हा त्रास होत असल्याचा गैरसमज अनेक जण करून घेतात. सप्तपर्णी वृक्ष विषारी नसून, गुणकारी आहे. किडे व पतंगांचे हे वृक्ष आवडीचे असून, या वृक्षाच्या वासामुळे गंभीर आजार होत नाहीत. सोशल मीडियावर चुकीचे संदेश व्हायरल केले जात आहेत. या वृक्षाच्या वासामुळे अनेकांना त्रास जाणवतो. मात्र, हा वास फुले येण्याच्या काळातच येतो. या वृक्षातून द्रव बाहेर पडते. या काळात वृक्षाजवळ कीटकदेखील जात नाहीत, असे रणधीर भोसले यांनी सांगितले.