पुसेसावळी – सातारा जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष व वर्धन अँग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांचा वाढदिवस रविवार दि. 12 रोजी आहे. मात्र ते आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. यंदा पाऊसकाळ समाधानकारक झाला नाही. तसेच, पुसेसावळी येथे घडलेली दुर्दैवी घटना, संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मराठा बांधवांच्या साखळी उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सातारा जिल्ह्यातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर, कार्यकर्ते, वर्धन ऍग्रो परिवारातील सभासद, शेतकरी, ऊसतोड वाहतूक कंत्राटदार शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असतात. परंतु, रविवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी ते बाहेरगावी असल्याने शुभेच्छांचा स्वीकारण्यास उपलब्ध असणार नाहीत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन परिश्रम घेत आहे. शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून सर्वांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया आपण दिलेल्या शुभेच्छा व आशीर्वाद पुसेसावळी येथील अप्रिय घटना कमी वेळेत आटोक्यात आणणाऱ्या व फक्त पुसेसावळी गावातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणाऱ्या पोलीस बांधवांना समर्पित करीत असल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले.