मायणी – येथील भारतमाता विद्यालयाची 20 व 21 डिसेंबर रोजी मुंबई दर्शन करण्यासाठी शैक्षणिक सहल काढण्यात आली होती. या शैक्षणिक सहलीस सकाळी 5:45 वाजता सुरुवात झाली. मात्र, सकाळी 9.30 वाजता पुण्याजवळ खेड-शिवापूर येथे एक गाडी बंद पडल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना तब्बल सहा तास नाहक त्रास सहन करावा लागल्याने वडूज एसटी डेपोचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.
सहलीतील शिक्षक महेश जाधव व चालक देशमुख यांनी वडूज डेपो व्यवस्थापक सौ. सय्यद यांना फोन करून याची कल्पना दिली असता त्यांनी व्यवस्था करतो असे सांगितले. तदनंतर चालक देशमुख यांनी त्यांच्या गाडीतील सर्व मुले चालक राऊत यांच्या गाडीमध्ये बसवून गाडी पुणे येथील चांदणी चौकात उभा करण्यात आली.
त्यानंतर चालक देशमुख यांनी ती मोकळी गाडी हळू-हळू स्वारगेट येथील डेपोत दुरुस्त करण्यासाठी लावली असता गाडीची काही मेजर अडचण असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शिक्षक महेश जाधव यांनी डेपो मॅनेजर यांना फोन करून एसटी लवकर उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी गाडी तुमची लवकरच दुरुस्त होऊन येईल असे सांगितले. मात्र ती गाडी सहा तास आलीच नसल्याने एसटीतील जवळपास ७६ मुलांना सहा तास रस्त्यावर नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मुंबई दर्शनमधील एक दिवस पुण्यातच गेला.
प्रवासात एसटी बंद पडल्यानंतर एका तासाच्या आत डेपोने एसटी देणे बंधनकारक असताना ही गाडी उपलब्ध झाली नाही. कारण त्यांनी कोणत्याही प्रकारचे त्यात लक्ष घातले नाही. शिक्षक महेश जाधव यांनी आम्हाला लवकर गाडी उपलब्ध करून द्या अशी वारंवार विनवणी करून सुद्धा याकडे कोणीच लक्ष दिले नाही. शिक्षक श्रीमंत कोकरे व उदय गुरव यांनी स्वारगेट येथील डेपो व्यवस्थापक सौ. पाटील यांना विनवणी केल्यानंतर ती गाडी दुरुस्तीस घेतली गेली. तोपर्यंत वडूज डेपो व्यवस्थापक यांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केली नव्हती. त्यानंतर तीच गाडी दुरुस्त होऊन सायंकाळी 3.45 वाजता विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आणि पुढील प्रवासाला सुरुवात झाली.
त्यानंतर महेश जाधव यांनी पुन्हा डेपो व्यवस्थापक यांना संपर्क साधून आम्हाला एक दिवस वाढवून द्या, अशी विनंती केली मात्र त्यांनी एका एसटीस परवानगी देतो असे सांगितले व दुसऱ्या एसटीस परवानगी नाकारली. असे का?कारण विचारले असता त्यांनी तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही का अशी उर्मट भाषा केली. एकाच शाळेची सहल असल्याने दुसरे विद्यार्थी पुढे घेऊन जाणे हे उचित ठरत नसताना इतर मुलांना तुम्ही का थांबून घेतले असा प्रश्न सौ सय्यद यांनी केला. ती जबाबदारी तुमची आहे असे सांगितले.
मात्र शिक्षकांना दोन्ही एसटी बरोबर घेऊन जाणे व मुलांची जबाबदारी घेणे बंधनकारक असते. त्यामुळे एक एसटी मागे आणि दुसरी पुढे असे करता येत नाही. त्यामुळे एका एसटीचा होणारा जादा खर्च कोण भरणार याला प्रश्नचिन्ह उभा राहत होते. त्यामुळे कोणतेही कारण नसताना डेपो व्यवस्थापकांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिल्याचे चित्र समोर आले आहे.