नायक सरदेसाई
सध्या राज्यात, देशात आणि जगभरात करोना विषाणूने कहर माजवलेला असतानाच मराठवाड्यातील सर्वांत मोठे शहर असणाऱ्या औरंगाबाद येथे “सारी’ या आजाराची साथ आल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. गेल्या 8 दिवसांमध्ये तेथे “सारी’मुळे 11 जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. ही संख्या औरंगाबादेत करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांपेक्षा अधिक आहे. यानिमित्ताने हा आजार नेमका काय आहे, हे समजून घ्यायला हवे.
सारी हे “सिव्हियर ऍक्युट रेस्पिरेटरी इलनेस’ चे लघुरुप आहे. हा आजार नवा नाही. औरंगाबादमध्येच गतवर्षी सुमारे 1 हजार रुग्ण सारी आजारामुळे बाधित झाले होते. त्यातील 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या आजाराविषयी चिंता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे करोनाची आणि सारीची लक्षणे ही सारखीच आहेत. दोन्हीही आजार आपल्या श्वसनसंस्थेशी संबंधित आहेत. करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाला श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. त्याचप्रमाणे श्वासोच्छ्वासास अडथळा येणे, धाप लागणे, प्रसंगी जीभ बाहेर काढून धापा टाकणे, ताप येणे, खोकला येणे, घसा खवखवणे, थकवा जाणवणे, अंग दुखणे ही सारीची लक्षणे आहेत. हा त्रास सुरू झाल्यामुळे शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा घटतो. करोना आणि सारी यामधील फरक चटकन लक्षात येत नाही. तपासणी-चाचणी केल्यानंतरच रुग्णाला नेमका कोणता आजार झाला आहे हे स्पष्ट होते. त्यामुळेच याबाबत सावध राहणे आवश्यक आहे.
मुळातच, कोणत्याही आजाराचे योग्य आणि अचूक निदान होणे हे त्यावर मात करण्यासाठीच्या किंवा तो नियंत्रणात राहण्यासाठीच्या प्रयत्नांच्या प्रक्रियेतील पहिले व महत्त्वाचे पाऊल असते. निदान चुकल्यास उपचारांची दिशा चुकते. परिणामी, रुग्णावर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच करोना असो वा सारी किंवा अन्य कोणताही आजार; तपासणी व चाचणी तत्काळ करून घेणे हिताचे ठरते. खासकरून, मधुमेह, अस्थमा, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी सध्याच्या काळात आणि एरव्हीही अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. कारण या रुग्णांना सारी आणि करोना हे दोन्हीही आजार जडण्याची शक्यता तुलनेने अधिक असते.
करोना आणि सारीमध्ये जरी साम्यस्थळे असली तरी एक प्रमुख फरक आहे आणि तो लक्षात घेतला पाहिजे. करोना हा विषाणूजन्य आजार आहे. तो संसर्गजन्यही आहे; तथापि, सारी हा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. तसेच तो संसर्गजन्य नाही. जर एखाद्या रुग्णाला श्वसनविकार असतील तरच सारी होऊ शकतो, असे दिसून आले आहे. एका पाहणीनुसार, जगभरात दरवर्षी 40 लाख जणांचा मृत्यू सारी या रोगामुळे होतो. वृद्ध आणि लहान मुले यांना सारी आजाराचा धोका अधिक असतो.
सारी हा आजार व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शनमुळे होऊ शकतो. सारीची लागण झाल्यास खूप ताप येतो, फुफ्फुसांना सूज येते. तसेच खूप कमी काळात रुग्णाची अवस्था गंभीर बनते. काही वेळा रुग्णाचा दोन-चार दिवसांत मृत्यूही होण्याची शक्यता असते.
करोना आणि सारी यांच्यातील साम्य आणि त्यांचा वाढता धोका लक्षात घेता सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे करोनाचा प्रकोप होऊनही आज अनेक जण सर्दी-खोकल्यावर किरकोळ उपचार करताना दिसतात.
अनेक जण आपल्या मनाने गोळ्या-औषधे घेतात. घरगुती उपाय करतात. काही जण तर अँटीबायोटिक गोळ्याही परस्पर घेताना दिसतात; तर बऱ्याच व्यक्ती पूर्वी घेतलेल्या गोळ्या-औषधे घेताना दिसतात. पण असे करणे अनेकदा धोकादायक ठरू शकते. घरगुती उपाय करूच नयेत असे नाही. परंतु केवळ तेवढ्यावरच विसंबून राहू नये. डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन त्यांनी दिलेली औषधे घेतानाच त्याला जोड म्हणून गरम पाणी पिणे, कोमट पाण्यात हळद-मीठ टाकून खळखळून गुळण्या करणे यांसारखे उपाय करावेत.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, सारी वा करोना किंवा अन्य प्रकारच्या आजारांपासून लांब राहण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्यावा. यासाठी नियमितपणाने व्यायाम करणे आवश्यक आहे. यामध्ये शरीराला दमवणारे व्यायाम करावेत. त्यातून स्टॅमिना वाढतो. तसेच प्राणायाम, अनुलोम-विलोम, भस्रिका, भ्रामरी प्राणायाम यांसारखे श्वसनाशी संबंधित व्यायाम आवर्जून करावे. रोजच्या आहारामध्ये “क’ जीवनसत्त्व वाढवणाऱ्या, पोषक घटकांचा अधिक समावेश असणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुयोग्य प्रकारे केल्यास आजारांना लांब ठेवण्यात बऱ्याच प्रमाणात यश येते.