चंदीगड – संयुक्त किसान मोर्चाने पंजाब विधानसभा निवडणूक लढवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मोर्चाच्या 9 सदस्यीय समन्वय समितीचे नेते जगजित सिंग दल्लेवालाव आणि डॉ.दर्शनपाल यांनी ही माहिती दिली. त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संयुक्त किसान मोर्चा हा देशभरातील 400 हून अधिक विविध वैचारिक संघटनांचा मंच आहे.
हा केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बनला आहे. किसान मोर्चाने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे कोणतेही आवाहन केलेले नाही किंवा निवडणूक लढविण्याची कोणतीही योजना नाही. जनतेने सरकारकडून त्यांचे हक्क मिळवण्यासाठी हा मंच तयार केला आहे. तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर संघटनेने संघर्ष स्थगित केला असला तरी उर्वरित मागण्यांबाबत १५ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पंजाबमधील 32 संघटनांबाबत ते म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत एकत्र येण्याबाबत एकमत झाले नाही. निवडणुकीत भाग घेणाऱ्या व्यक्ती किंवा संघटना संयुक्त किसान मोर्चा किंवा 32 संघटनांच्या नावाचा वापर करणार नाहीत, असे केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, क्रांतिकारी किसान युनियन (डॉ. दर्शनपाल), बीकेयू क्रांतीकारी (सुरजित फूल), बीकेयू सिद्धूपूर (जगजित डल्लेवाल), आझाद किसान समिती दोआबा (हरपाल संघ), जय किसान आंदोलन (गुरबख्श बरनाळा), दसुहा गन्ना संघर्ष समिती (सुखपाल डफर), किसान संघर्ष समिती पंजाब (इंद्रजीत कोटबुधा), लोक भाली इंसाफ वेलफेअर सोसायटी (बलदेव सिरसा) आणि कीर्ती किसान युनियन पंजाब (हरदेव संधू) यांनी 32 संघटनांसमोर निवडणूक लढविण्याविरुद्ध स्पष्ट भूमिका घेतली आहे.