रत्नागिरी : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याशिवाय त्यांनी संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं यासाठी त्यांनी शरद पवारांकडे स्वत:च्या नावाचा प्रस्ताव दिला होता,’ असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
“संजय राऊत यांनी 2019ला मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांकडे स्वत:च्या नावाचा प्रस्ताव दिला होता. शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊत यांचं नाव उद्धव ठाकरेंकडे सूचवलं होतं. राऊतांना मुख्यमंत्री करा म्हणून सांगितलं होतं. पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळच होतं. त्यांनी राऊतांचं नाव नाकारलं. तेव्हापासून राऊत यांची नाटकं आणि षडयंत्र सुरू झाली आहेत. हा घरात घेण्याच्या लायकीचा नाही, दुसऱ्यांच्या घरात हा आग लावण्यापलीकडे काही करू शकत नाही,” असे नितेश राणे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “संजय राजाराम राऊत हे पूर्ण नाव किती लोकांना माहिती आहे? असं मला महाराष्ट्राला विचारायचं आहे. कुठल्या बापाचे नाव लावतोस हे संजय राऊतला विचारायचं आहे. कोणाचा बाप काढायचा, भांडण लावायचं, भावा भावात वाद लावायचं हे पहिल्यापासून त्याचे धंदे आहेत. पवार कुटुंबियातही भांडणे लावण्याचे काम त्याने सुरू केले आहे. पण अजितदादांनी त्याला खडसावले.”
आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात वाद
“आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यातही राऊत यांनी वाद लावले आहेत. महाविकास आघाडीत आदित्य ठाकरेचं प्रस्थ वाढू लागलं आहे. तर शिवसेनेत आदित्य, त्याची नाईट लाईफ गँग आणि वरुण सरदेसाईचा प्रभाव वाढतोय. हे लोक ताकदीने वाढतायत हे संजय राऊतच्या लक्षात आल्यावर त्याने आणि त्याच्या टोळीने आदित्य ठाकरेंविरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला,” असेही नितेश राणे म्हणाले.